जम्मू कश्मीरच्या पुलवामा हल्ल्यामध्ये देशाचे ४० जवान शहीद झाले. संपूर्ण देश शोकसागरात बुडाला असताना, पंतप्रधान नरेंद्र मोदी उत्तराखंडच्या जीम कार्बेट नॅशनल पार्कमध्ये संध्याकाळपर्यंत एका फिल्मसाठी व्हिडिओ शूटिंग करण्यात व्यस्त होते, अशी टीका काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सूरजेवाला यांनी केली आहे. पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर मोदींची वर्तवणूक अत्यंत बेजाबदारपणाची होती, असेही ते म्हणाले आहेत. या हल्ल्यावर भारतीय जनता पार्टी राजकारण करत असल्याचाही आरोप त्यांनी केला आहे. यावेळी सूरजेवाल यांनी पूलवलामा हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांच्या अंत्ययात्रेत काही भाजप नेत्यांचे वर्तन लाजिरवाणे होते असे म्हणत फोटो दाखवले.
नेमकं काय म्हणाले सूरजेवाला?
रणदीप सूरजेवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर सडकून टीका केली आहे. ‘जगात तुम्ही असा पंतप्रधान बघितला आहे का? माझ्याकडे खरोखरच बोलण्यासाठी शब्द नाहीत. पंतुप्रधानांनी पुलवामा हल्ल्याला गांभिर्याने घेतलेलं नाही. ते या हल्ल्यावर राजकारण करत आहेत. मोदींना तर राजधर्माचा विसरच पडला आहे. ते आता फक्त सत्ता वाचवण्याच्या मागे लागले आहेत, असा आरोप सूरजेवाल यांनी केला.’ यावेळी त्यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्यावरही टीका केली. ते म्हणाले की, ‘अमित शहा यांनीही पुलवामा हल्ल्याचे राजकारण केलं. ‘पुलवामा हल्ल्यातील जवानांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही कारण आता केंद्रात सत्ता काँग्रेसची नाही तर भाजपची आहे, असं म्हणून त्यांनीही या मुद्दावरुन राजकारण करण्याचा प्रयत्न केला.’ ‘भाजपला दहशतवादावरुन राजकारण करण्याची घाणेरडील सवय आहे’, असा आरोपही त्यांनी यावेळी केला.
Randeep Surjewala, Congress: When the whole country was mourning the loss of lives of our jawans in #PulwamaAttack in the afternoon, PM Narendra Modi was busy shooting for a film in Jim Corbett park till evening. Is there any PM in the world like this? I have no words really. pic.twitter.com/P5mgnU3drA
— ANI (@ANI) February 21, 2019