कुन्नूरच्या हेलिकॉप्टर दुर्घटनेत बचावलेले इंडियन एअर फोर्स (IAF) चे वरूण सिंह हे बंगळुरू येथील रूग्णालयात मृत्यू्शी झुंज देत आहेत. त्यांना एअरलिफ्ट करून बंगळुरूला आणल्याचे वृत्त पीटीआय या वृत्तसंस्थेने दिले आहे. अल्पावधीतच म्हणजे २४ तासांच्या कालावधीत त्यांच्यावर ३ शस्त्रक्रिया झाल्याचीही माहिती समोर आली आहे. पण ग्रुप कॅप्टन वरूण सिंह यांनी आपल्या शाळेच्या मुख्याध्यापक आणि शिक्षक वर्गाला लिहिलेले एक पत्र आता व्हायरल झाले आहे. आपल्या आयुष्यात वेळोवेळी मदत करणाऱ्या शिक्षक आणि प्रशिक्षकांचे आभार मानणारे हे पत्र आहे. त्याचवेळी आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांना त्यांनी दिलेला संदेश हा सध्याच्या परिस्थितीशी अत्यंत बोलका आहे. कधीही आशा सोडू नका, असाच संदेश त्यांनी विद्यार्थ्यांना दिला होता.
कधीच आशा सोडू नका, अनेकदा गोष्टी तुम्हाला हव्या तशा घडणार नाहीत. पण तुम्हाला अपेक्षित गोष्टी सहजपणे तुम्हाला मिळणारही नाहीत. त्यासाठी तुम्हाला परिश्रम करावा लागेल. तुमचा वेळ आणि त्यागही अशा गोष्टींसाठी महत्वाचा असेल. मीदेखील एकेकाळी सरासरी विद्यार्थी होतो. पण आज मी माझ्या जीवनात अनेक कठीण परिस्थितीवर मात करत, याठिकाणी पोहचलो आहे. तुमचे १२ वी चे गुण हे तुमचे करिअर ठरवत नाहीत. तुम्हाला आयुष्यात काय साध्य करायचे आहे, त्यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत. तुम्हाला जे करायचे आहे, त्यादृष्टीने काम करायला सुरूवात करा, असाही संदेश त्यांनी पत्रात लिहिला आहे.
ग्रुप कॅप्टन सिंह यांना शौर्य चक्राने नुकतेच सन्मानित करण्यात आले. तेजस एअरक्राफ्टमध्ये निर्माण झालेल्या तांत्रिक अडचणीनंतरही त्यांनी अतिशय शौर्य दाखवत तेजस एअरक्राफ्टचे सेफ लॅण्डिंग केले होते. हा प्रतिष्ठेचा पुरस्कार मी माझ्या शालेय जीवनापासून ते एनडीएपर्यंतच्या सर्व शिक्षक आणि प्रशिक्षकांना समर्पित करत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. माझ्या सर्व प्रकारच्या कृतींसाठी माझ्या शिक्षकांचे संस्कार माझ्यावर आहेत.
एखादा सरासरी विद्यार्थी असणे ही बाबही ठीक आहे. प्रत्येकजण शालेय जीवनात चमकदार कामगिरी करत ९० टक्के गुण मिळवतो असे नाही. तुम्हाला ९० टक्के मिळाले नसले तरीही या गोष्टीतही काहीही चिंता करण्यासारखी गोष्ट नाही. पण तुम्ही उत्तुंग कामगिरी केली तर ही कामगिरी नक्कीच कौतुकास्पद आहे. हरियाणातील चंदीमंदिर येथील आर्मी पब्लिक स्कुलच्या मुख्याध्यपकांना त्यांनी पत्र लिहिले होते.
पण तुम्हाला एखादी गोष्ट साध्य करता आली नाही, तरीही तुम्ही सर्वसाधारण आहात असे समजू नका. तुमच्या आयुष्यात येणाऱ्या गोष्टींचे मूल्यांकन करा, असेही त्यांनी पत्रात लिहिले आहे. तुमची आवड कशात आहे, ती गोष्ट शोधा. ती गोष्ट कला, गाण, ग्राफिक डिझाईन, साहित्य अशी कोणतीही आवड असु शकेल. त्यासाठी प्रयत्न करा, तुमची सर्व मेहनत या गोष्टीसाठी असायला हवी.
सिंह हे वायुदलाच्या डिफेन्स सर्व्हीस स्टाफ कॉलेज, वेलिंग्टनमध्येही मार्गदर्शक होते. तसेच २०१९ मध्ये भारताच्या अवकाश मोहिम गगनयानच्या पहिल्या १२ जणांच्या यादीतही वरूण सिंह यांचा समावेश होता. पण आरोग्याच्या निकषामुळे त्यांना या मोहीमेवर जाण्याची संधी मिळाली नाही.
Group Captain Varun Singh Health Updates: ग्रुप कॅप्टन वरूण सिंहांना बंगळुरूला केले एअरलिफ्ट