एकीकडे देशात अनेक ठिकाणी FASTAG यंत्रणेमधल्या तांत्रिक अडचणी अजूनही सुटण्याचं नाव घेत नसताना आता हीच प्रणाली देशभरात सक्तीची करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. येत्या १ जानेवारीपासून देशातल्या सर्व वाहनांना FASTAG लावणे सक्तीचे करण्यात आले आहे. त्यामुळे याचा आगामी काळात कसा परिणाम होईल, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी एका कार्यक्रमात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभागी झाल्यानंतर ही माहिती दिली आहे. या पार्श्वभूमीवर देशभरात ज्यांच्या वाहनांना FASTAG आहे आणि ज्यांच्या वाहनांना FASTAG नाही, त्यांच्याही चिंतेत भर पडली आहे.
Union Minister Nitin Gadkari announces that FASTag is being made mandatory for all vehicles in country from 1st Jan, 2021. He says it's useful for commuters as they will not need to stop at toll plazas for cash payments, saving time & fuel: Ministry of Road Transport & Highways pic.twitter.com/jhRhIAYVua
— ANI (@ANI) December 24, 2020
काय म्हणाले नितीन गडकरी?
FASTAG प्रणालीविषयी १ जानेवारीपासून लागू करण्यात आलेल्या निर्णयाची माहिती यावेळी नितीन गडकरींनी दिली. ‘FASTAG १ जानेवारी २०२१ पासून देशातल्या सर्व वाहनांसाठी सक्तीचे करण्यात आले आहे. हे प्रवाशांसाठी उपयोगी ठरणार आहे. यामुळे त्यांना टोल भरण्यासाठी टोल नाक्यांवर थांबण्याची आवश्यकता पडणार नाही. यामुळे प्रवाशांचा वेळ आणि पेट्रोल अशा दोन्हींची बचत होईल’, असं ते म्हणाले.
दरम्यान, FASTAG बाबत अनेक ठिकाणी तक्रारी देखील येत आहेत. अनेक ठिकाणी हे FASTAG स्कॅनच होत नसल्यामुळे प्रवाशांना पुन्हा रोख रकमेतच टोल भरावा लागत आहे. तर काही ठिकाणी टोल नाक्यांवर FASTAG प्रणाली बंदच असल्याचं तिथल्या कर्मचाऱ्यांकडून सांगितलं जातं. त्यामुळे ही प्रणाली सक्तीची केल्यामुळे प्रवाशांचा फायदा होणार आहे की नुकसान? याचा देखील विचार व्हायला हवा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.