देशाच्या ढासळलेल्या अर्थव्यवस्थेवरून राष्ट्रवादी काँग्रेसने टीका केली आहे. शुक्रवारी आरबीआयचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी देशाच्या उत्पन्नाचा दर किती असेल याची माहिती दिली. नव्या अंदाजानुसार २०२१-२२ मध्ये सकल राष्ट्रीय उत्पन्नाचा दर ९.५ टक्के राहील तर वर्षाच्या सुरुवातीलाच हा अंदाज १०.५ टक्के राहील असा अंदाज होता असं शक्तीकांत दास म्हणाले. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक टीका केली आहे. रिझर्व्ह बॅंकचे गव्हर्नर किंवा त्यांची संपुर्ण व्यवस्था देशाची अर्थव्यवस्था मोजण्यात अपयशी होत असेल तर देशाची अर्थव्यवस्था पूर्णपणे कोलमडून पडेल अशी भीती नवाब मलिक यांनी व्यक्त केली आहे.
देशाचा जीडीपी उणे ७.५ गेला ही सत्य परिस्थिती आहे. याचा अर्थ रिझर्व्ह बॅंकेकडून आकलन चुकीचे होत आहे. सरकार पैसे मागतेय तर तुम्ही देताय. रिझर्व्ह बॅंकेला हे कळलं पाहिजे. तुम्ही अंदाज घेत नाही मग देशाची अर्थव्यवस्था कशी चालणार आहे असा सवालही नवाब मलिक यांनी केला आहे. रिझर्व्ह बॅंकेने कबूल केले आहे हे चांगलं आहे परंतु आकलन चुकत असेल तर हे देशासाठी सारखं सारखं चांगलं राहणार नाही असेही मत नवाब मलिक यांनी मांडले आहे.
केंद्राने निव्वळ हेडलाईन मॅनेजमेंट करु नये
केंद्र सरकारने निव्वळ हेडलाईन मॅनेजमेंट करण्याऐवजी देशाचा एक चार्ट बनवून देशातील जनतेसमोर ठेवावा अशी मागणी नवाब मलिक यांनी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी बैठका घेत आहेत ही चांगली गोष्ट आहे परंतु बैठका घेऊन फक्त या महिन्यात १२ कोटी, डिसेंबरपर्यंत २१० कोटी लसी उपलब्ध होईल असे सांगणे किती योग्य आहे असा सवालही नवाब मलिक यांनी केला आहे.
राज्यांना कशापध्दतीने लस पुरवठा करणार याची माहिती दिली पाहिजे. केंद्र किती खरेदी करणार, राज्यांना किती मिळणार आणि खाजगी लोकांना खरेदी करुन त्यांनी त्याचा वापर किती करावा याबाबतची स्पष्टता केंद्रसरकारने आजपर्यंत जाहीर केलेली नाही असेही नवाब मलिक यांनी सांगितले. कधी प्रकाश जावडेकर वेगळं बोलतात तर कधी जे. पी. नड्डा वेगळी घोषणा करतात.फक्त वेगवेगळ्या हेडलाईन होण्यासाठी हे लोक बोलत असल्याचा आरोपही नवाब मलिक यांनी यावेळी केला आहे.
१२ कोटी लस पुरवठा जूनपर्यंत होणार होता मात्र आजपर्यंत किती पुरवठा झाला असा सवाल करतानाच कालपर्यंत लसीकरण केंद्रे बंद होती. जी सत्यता आहे ती स्वीकारली पाहिजे आणि त्यानुसार कार्यक्रम बनवून देशासमोर ठेवावा अशी मागणीही नवाब मलिक यांनी केली आहे.