नवी दिल्लीः 78,000 पेक्षा जास्त तिरंगे फडकावून भारताने इतिहास रचला आहे. तसेच 23 एप्रिल रोजी एकाच वेळी सर्वाधिक राष्ट्रध्वज फडकावून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये आपले नाव नोंदवले. या ऐतिहासिक दिवशी केंद्रीय गृहमंत्री अमित शहादेखील उपस्थित होते. 23 एप्रिलला भोजपूर, बिहार येथे ‘वीर कुंवर सिंह विजयोत्सव’ कार्यक्रमात एकाच वेळी 78,220 ध्वज फडकावून भारताने गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव नोंदवण्यात आले, असंही सांस्कृतिक मंत्रालयाने सांगितले.
गिनीज बुकच्या प्रतिनिधींनी हा रेकॉर्ड याचि देही याचि डोळा पाहिला. भारतातील स्वातंत्र्याचा अमृत उत्सव साजरा करण्यासाठी गृह मंत्रालय आणि सांस्कृतिक मंत्रालयाने 23 एप्रिल 2022 रोजी जगदीशपूर, भोजपूर, बिहार येथे सर्वाधिक संख्येने झेंडे फडकावण्याचा विक्रम केल्याचंही गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड सर्टिफिकेटमध्ये म्हटले आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत शनिवारी बिहारमधील भोजपूर जिल्ह्यातील दलौर मैदानावर 78,220 लोकांनी एकत्रितपणे राष्ट्रध्वज फडकावला आणि नवा विक्रम अन् इतिहास रचला.
याआधी पाकिस्तानने जवळपास 18 वर्षांपूर्वी लाहोरमध्ये एका कार्यक्रमात 56,000 पाकिस्तानींनी आपला राष्ट्रध्वज फडकावून विश्वविक्रम केला होता. केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांनी ANI ला सांगितले की, ‘महान स्वातंत्र्य सेनानी बाबू वीर कुंवर सिंग यांच्या जयंतीनिमित्त जगदीशपूरमध्ये संपूर्ण पाच मिनिटे भारतीय राष्ट्रध्वज फडकावण्यात आला आणि स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यात आला. 23 एप्रिलला जगदीशपूरमध्ये आयोजित ‘विजयोत्सव कार्यक्रमात’ लोकांनी ध्वजारोहण केले. वीर कुंवर सिंह यांनी आपली शेवटची लढाई 23 एप्रिल 1858 रोजी जगदीशपूरजवळ लढली आणि या युद्धात ईस्ट इंडिया कंपनीचा पराभव केला. जगदीशपूर किल्ल्यावरून युनियन जॅकचा ध्वज उतरवून देशसेवेत कुंवर सिंग शहीद झाले.
हेही वाचाः मुख्यमंत्र्यांच्या इशार्याने मुंबईत हिंसाचार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा आरोप