पंतप्रधान नरेंद्र मोदी दरवर्षी देशाच्या सीमेवर असलेल्या सुरक्षा रक्षक, जवानांसोबत आपली दिवाळी साजरी करत असतात. यंदाही पंतप्रधान मोदी सीमेवरील जवानांसोबत दिवाळी साजरा करण्यासाठी जाणार आहेत. गुरुवारी भारत-पाकिस्तानच्या नियंत्रण रेषेजवळील राजौरी जिल्ह्यात नौशेरा सेक्टरमधील जवानांसोबत दिवाळी साजरी करणार आहेत. हा भाग खास असून इथे अनेकांना युद्धादरम्यान वीरगती प्राप्त झाली आहे.
राजौरी जिल्ह्यातील नौशेरा सेक्टरचा इतिहास हा देशाची मान अभिमानाने उंचवण्यासारखा आणि शहिदांना मानवंदना वाहण्यासारखा आहे. १९४७ मध्ये पाकिस्तानच्या आदेशानुसार आदिवासींनी राजौरी जिल्ह्यावर हल्ला केला होता. या हल्ल्यात शंभरहून अधिक जवान शहीद झाले होते. तर स्थानिक लोक आणि जवानांनी या हल्ल्याला सडेतोड उत्तर देत आदिवासींना पिटाळून लावले होते. १२ एप्रिल १९४८ पर्यंत हा संघर्ष करत जवानांनी आदिवासींना हद्दपार करुन राजौरीवर वर्चस्व मिळवले. यामुळे दरवर्षी दिवाळीच्या सणाला राजौरीमध्ये आदिवासींच्या हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहिली जाते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी दिवाळीच्या सणाला नियंत्रण रेषेची जबाबदारी सांभाळणाऱ्या नौशेरा ब्रिगेडमध्ये असतील. मोदी गुरुवारी सकाळी ९ वाजता नौशेराला पोहचतील. दुपारी १ वाजेपर्यंत जवानांसोबत गप्पा मारतील. पंतप्रधान येणार असल्यामुळे जवानांमध्ये आनंद, उत्साहाचे वातावरण असून सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मागील ३ वर्षांत दुसऱ्यांदा राजौरीमध्ये जवानांसोबत दिवाळी साजरी करण्यासाठी जात आहेत. पहिल्यांदा मोदी कलम ३७० आणि ३५ए हटवल्यानंतर राजौरीमध्ये गेले होते. मोदी जवानांचा उत्साह आणि मनोधैर्य वाढवण्यासह पाकिस्तानला थेट संदेश असेल. यापुर्वी जेव्हा चीनच्या कारवाया सुरु होत्या तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लडाख दौरा करुन तेथील जवानांचे मनोधैर्य वाढवले होते.
हेही वाचा : Petrol Diesel Price Drop : केंद्राकडून पेट्रोल-डिझेल दर कपात, काँग्रेसचा भाजपवर खोचक निशाणा