मुंबई : समाजमाध्यमांवर मोदीविरोधी संदेशांचा भडीमार सुरू आहे आणि मोदी यांचे भगतगण या भडीमारामुळे हवालदिल झाले आहेत. हिंदू-मुसलमान, भारत-पाकिस्तान, राममंदिर यापलीकडे भगतगणांची धाव नाही. समाजमाध्यमांवर जो मोदी यांची बाजू घेईल त्यास लोकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. ही निवडणूक मोदी आणि त्यांच्या लोकांच्या हातात राहिलेली नसून लोकांनी हातात घेतली आहे. त्यामुळे ‘चारशे पार’चा जुमला म्हणजेही वेडेपणाच आहे, असे टीकास्त्र ठाकरे गटाने भाजपावर सोडले आहे.
ग्रामीण भागातले अर्धशिक्षित लोकदेखील मोदींच्या खोटेपणावर आणि इलेक्टोरल बाँडवर बोलत आहेत. वाढत्या महागाईमुळे महिला वर्गाची बोंबाबोंब सुरू आहे. भाजपाचा जनाधार म्हणजे वाळूचा किल्ला होता. तो कोसळला आहे, अशी टीका सामना दैनिकातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने केली आहे.
हेही वाचा – Lok Sabha 2024 : हवा ही अशीच बनत असते, ठाकरे गटाचा मोदी यांच्यावर निशाणा
‘वॉर रुकवा दी पापा’ या मोदीकृत जाहिरातबाजीची चेष्टाच सुरू आहे. लोक मोदी आणि त्यांच्या लोकांना हसत आहेत. मागची दहा वर्षे गंडवागंडवी करणारे देशातील जनतेला तिसऱ्यांदा गंडविण्यात अपयशी ठरत आहेत, असे सांगून ठाकरे गट म्हणतो की, गुजरात, राजस्थान वगैरे भागांत संपूर्ण राजपूत समाज मोदी यांच्या अंगावर आला, पण राजपुतांचे मोदींविरोधी उग्र आंदोलन एकही मीडिया दाखवत नाही. तोच मीडिया बोगस सर्व्हे करून मोदी विजयी होत असल्याचे सांगतो, हे गमतीचे आहे.
‘सर्व्हे’च्या माध्यमातून हे लोक हवाबाजी करीत आहेत. गोदी मीडिया म्हणून कुख्यात ठरलेल्या कंपन्या ‘पोल’ कंपन्यांना हाताशी धरून मोदी यांना मान्य होतील असे आकडे सर्व्हेतून समोर आणत आहेत. लोकांना भ्रमित करण्याचा हा प्रकार आहे. मुंबईत म्हणे शिवसेनेला एकही जागा मिळणार नाही. मग मुंबईतील जागा बिनविरोध भाजप आणि त्यांच्या सोबत असलेल्या बेइमान गटास मिळणार आहेत का? असा खोचक सवाल ठाकरे गटाने केला आहे.
अमरावतीच्या मावळत्या खासदार नवनीत राणा यांनी नकळत सांगितलेले सत्य महत्त्वाचे ठरते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची हवा नाहीच आणि आता कृत्रिम हवादेखील निर्माण होणार नाही. तरीही ‘सर्व्हे’ची हवा का केली जात आहे? भाजपाचे सर्वच मुखवटे गळून पडले आहेत. जनतेनेदेखील आता इतके उग्र रूप धारण केले आहे की, लोकांनी फुंकर मारली तरी मोदी आणि त्यांचे लोक उडून जातील, असे उपहासात्मक टीका ठाकरे गटाने केली आहे.
हेही वाचा – Lok Sabha 2024 : आजचे रावण हे शतमूर्ख आहेत, ठाकरे गटाचा कोणाला टोला?