पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांनी नरेंद्र मोदी यांच्या शपथविधीला न जाण्याचा निर्णय घेतला आहे. मोदींच्या शपथविधी सोहळ्याचे निमंत्रण ममता बॅनर्जी यांना देण्यात आले होते. ममता यांनी ते निमंत्रण स्विकारले असून शपथविधीला जाणार, असे ममता बॅनर्जी म्हणाल्या होत्या. मात्र, दुसऱ्याच दिवशी ममता बॅनर्जी यांनी मोदींना पत्र पाठवले आहे. हे पत्र ममता यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर शेअर केले आहे. यामध्ये त्यांनी आपण शपथविधीला उपस्थित राहणार नाही, असे ममता बॅनर्जी म्हणाल्या आहेत.
काय आहे नेमकं प्रकरण?
मोदींचा ३० मे रोजी शपथविधी कार्यक्रम संपन्न होणार आहे. या कार्यक्रमाचे निमंत्रण बुधवारी ममता बॅनर्जी यांना देखील पाठवण्यात आले होते. हे निमंत्रण ममता यांनी स्विकारुन कार्यक्रमाला हजर राहण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून पश्चिम बंगाल आणि भाजप यांच्यात झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर ममता खरच शपथविधीला जाणार का? असा प्रश्न उपस्थित झाला होता. या विषयावर सोशल मीडियावर देखील चर्चांना उधान आले होते. या सर्व चर्चांनंतर ममता यांनी आपला निर्णय बदलला आहे. ममता बॅनर्जी यांनी आता शपथविधीला न जाण्याचा निर्णय घेतला आहे.
उपस्थित न राहण्याचे काय आहे कारण?
ममता बॅनर्जी यांनी पत्र लिहून नरेंद्र मोदींना शपथविधीला उपस्थित न राहण्यामागचे कारण सांगितले आहे. या पत्रात तिने म्हटले आहे की, ‘तुमचे संविधानिक आमंत्रण स्विकारले. परंतु, शपथविधी कार्यक्रमाला उपस्थित राहू शकत नाही.’ यापुढे त्यांनी म्हटले की, ‘भाजपने ५४ कार्यकर्त्यांच्या कुटुंबियांना निमंत्रण दिले आहे. ज्यांची हत्या राजनैतिक झाल्याचे भाजपकडून सांगण्यात आले. परंतु, बंगालमध्ये अशी कोणतीही राजनैतिक हत्या झालेली नाही. ज्या काही हत्या झाल्या आहेत, त्या वैयक्तिक भांडणामुळे झाल्या आहेत. परंतु, या सर्व घडामोडींमोडींना राजकीय रंग दिला गेला. त्यामुळे नरेंद्र मोदीजी सॉरी मी आपल्या शपथविधी कार्यक्रमाला येऊ शकत नाही.’
The oath-taking ceremony is an august occasion to celebrate democracy, not one that should be devalued by any political party pic.twitter.com/Mznq0xN11Q
— Mamata Banerjee (@MamataOfficial) May 29, 2019