असंख्य जाती, जमाती आणि धर्म असलेल्या आपल्या देशात अनेकदा धार्मिक ध्रुवीकरणाचे वातावरण आपण पाहीले असेल. त्यासोबतच धार्मिक ऐक्य दाखवणाऱ्या अनेक घटना आपल्याबाजुला घडत असतात. धर्माच्या पुढे जाऊन माणूसकीचे दर्शन घडवणारी एक घटना कर्नाटक राज्यात घडली आहे. एकाकी असलेल्या ५२ वर्षीय महिलेचा अंत्यविधी मुस्लीम समाजाच्या तरुणांनी केला आहे. या मुस्लीम तरुणांनी ही मदत करुन समाजाच्या अनैतिक नितीमुल्यांना चपराक दिली आहे. धर्माच्या पलिकडे मानवता धर्म श्रेष्ठ असल्याची जाणीव या तरुणांनी करुन दिली आहे.
नक्की काय आहे प्रकार?
कर्नाटकाच्या पुत्तूर शहरामध्ये भवानी नावाच्या एका ५२ वर्षीय महिलेचे हृदय विकाराच्या झटकाने निधन झाले. भवानी यांचे लग्न झाले नव्हते. त्या त्यांच्या भाऊ कृष्णा यांच्याजवळ वास्तव्यास होत्या. भवानी यांच्या मृत्यूनंतर अंत्यविधीसाठी त्यांच्या भावाने नातेवाईकांना मदतीसाठी बोलविले. परंतु, नातेवाईकांमधून एकही व्यक्ती मदतीसाठी पुढे सरसावली नाही. त्यामुळे मृतदेह बराच वेळ कृष्णा यांच्या घरातच पडून होता. अखेर या घटनेची माहिती शौखथ, हमजा, नसीर, रियाज आणि फारुख या मुस्लीम तरुणांना कळाली. त्यांनी तातडीने या मृतदेहाच्या अंत्यविधीसाठी पैसै गोळा करण्यास सुरुवात केली. अंत्यविधी अगोदर अंगणवाडी शिक्षिका राजेश्वरी, स्वयंसेविक सफिया आणि झुबाइडा यांनी परंपरेप्रमाणे मृतदेहाला स्नान घातले. त्यानंतर अंतिम संस्कार करण्यात आले.
आम्ही प्रसिद्धिसाठी मदत नाही केली – फारुख
अंत्यविधीसाठी पुढे आलेल्या मुलांपैकी फारुख म्हणाला की, ‘आम्ही प्रसिद्धिसाठी मदत केली नाही. आम्ही मृत व्यक्तीचे जात आणि धर्म न बघता मदत केली आहे. आम्हाला फक्त एकच संदेश द्यायचा आहे की, एखादी व्यक्ती मरण पावल्यानंतर तरी या गोष्टींचा विचार केला जाऊ नये.’