ईशान्य भारतातील अनेक राज्ये मुसळधार पाऊस आणि पुरामुळे त्रस्त आहेत. यात आसाम आणि मेघालयमधील परिस्थती सर्वात वाईट आहे. दोन्ही राज्यांमध्ये पूर आणि पावसामुळे 19 लाखांहून अधिक लोक बाधित झाले आहेत. तर त्रिपुराची राजधानी आगरतलामध्ये पावसाने 60 वर्षांचा विक्रम मोडीत काढला आहे. दोन्ही राज्यांमध्ये सुरु असलेल्या संततधार पावसामुळे अनेक ठिकाणी दरड कोसळण्याच्या घटना समोर येत आहेत.
यात भारतीय हवामान विभागाने आसाम आणि मेघालयमध्ये आज म्हणजेच सोमवारी मुसळधार पावसाचा इशारा दिली आहे. यासाठी दोन्ही राज्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. या दोन्ही राज्यांत झालेल्या मुसळधार पावसामुळे आत्तापर्यंत 62 जणांचा मृत्यू झाला. तर 10 हजारांहून अधिक लोकांना विविध ठिकाणांहून सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे.
आसाममधील पुरस्थिती रविवारी गंभीर झाल्याने यात आणखी आठ जणांचा मृत्यू झाला. तर पुरामुळे जिल्ह्यातील 37 लाखांहून अधिक लोक बाधित झाले आहेत. आसामधील राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणच्या म्हणण्यानुसार, भूस्खलनामुळे आत्तापर्यंत तीन लोकांचा मृत्यू झाला आहे. तर दिवसभरात वेगवेगळ्या ठिकाणी पाच जण बुडाल्याची घटना घडली.
यामुळे पूर आणि भूस्खलनात मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या 70 झाली आहे. प्राधिकरणाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, राज्यातील 30 जिल्ह्यांतील 4,462 गावांमध्ये 37,17,800 हून अधिक लोकांना पुराचा फटका बसला आहे. तर राजधानी गुवाहाटीमध्ये रात्रभर झालेल्या पावसामुळे अनेक भागात पाणी साचले आहे. प्रशासनाने गुवाहाटी शहर धरणाचे भारलूचे सर्व दरवाजे बंद केले आहेत.
गेल्या आठवड्यापासून सुरू असलेल्या पावसामुळे आसामच्या विविध भागात जनजीवन विस्कळीत झाले आहे. शहरातील कामाख्या, खारघुली, हेंगराबारी, सिलपुखुरी आणि चंदेरी कॉलनीसह अर्धा डझन ठिकाणी भूस्खलनाची नोंद झाली आहे. शेजारच्या मेघालय राज्यातही पाऊस आणि पुरामुळे परिस्थिती बिकट झाली आहे. राज्यात सुमारे पाच लाख लोक बाधित झाले आहेत, तर भूस्खलनामुळे दोन राष्ट्रीय महामार्ग तुटले आहेत.