सर्वोच्च न्यायालयात एक जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. यामध्ये संविधानाच्या अनुच्छेद १ मध्ये दुरुस्ती करुन ‘इंडिया’ शब्द काढून देशाचे नाव ‘भारत’ किंवा ‘हिंदुस्तान’ लिहावे, अशी मागणी करण्यात आली आहे. अशी याचिका दिल्लीतील एका व्यक्तीने सर्वोच्च न्यायालयात दाखल केली असून या याचिकेवर २ जून रोजी न्यायालयात अंतिम सुनावणी करण्यात येणार आहे.
Supreme Court to hear on June 2 the petition seeking replacement of word 'India' with 'Bharat'. The petitioner, Namah, has sought a direction to change the English name of country INDIA to BHARAT. pic.twitter.com/KwgfdwS3Gg
— ANI (@ANI) May 29, 2020
नेमके काय म्हटले आहे याचिकेत…
संविधानाच्या अनुच्छेद १ मध्ये दुरुस्ती करुन ‘इंडिया’ हा इंग्लिश शब्द काढून देशाचं नाव ‘भारत’ किंवा ‘हिंदुस्तान’ करावे, असे निर्देश केंद्र सरकारला देण्याची मागणी याचिकेत करण्यात आली आहे. इंग्लिश नाव प्रतिकात्मक असले तरी ते काढून आपल्या राष्ट्रीयतेमध्ये अभिमानाची भावना निर्माण होईल, विशेषत: पुढच्या पीढीच्या मनात. ‘इंडिया’ शब्दाऐवजी ‘भारत’ लिहिल्याने आपल्या पूर्वजांच्या कठीण संघर्षामुळे मिळालेल्या स्वातंत्र्याला न्याय मिळेल,” असे याचिकेत म्हटले आहे.
देशाला मूळ, वास्तविक नाव देण्याची वेळ
याचिकेत १९४८ मध्ये तत्कालीन प्रस्तावित संविधानाच्या आर्टिकल १ संदर्भात संविधान सभेच्या चर्चेचा दाखला देत असे सांगितले की, “देशाचं नाव ‘भारत’ किंवा ‘हिंदुस्तान’ ठेवण्याच्या बाजूने अनेक जण होते. आता देशाला मूळ आणि वास्तविक नाव भारत देण्याची वेळ आली आहे. विशेषत: आता आपल्या शहराची नावं भारताच्या आत्म्याशी जोडून बदलली जात आहेत.” याकरता आर्टिकल १ मध्ये अशाप्रकारच्या दुरुस्तीची मागणी करण्यात आली आहे.
सर्वोच्च न्यायालयात याचिकेवर होणार सुनावणी
या याचिकेवर शुक्रवारी सुनावणी होणार होती. परंतु सरन्यायाधीश एस ए बोबडे गैरहजर असल्याने इतर याचिकांसह या याचिकेवरील सुनावणीही २ जूनपर्यंत टाळण्यात आली असल्याचे सांगण्यात येत आहे. आता सरन्यायाधीश एस ए बोबडे यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमोर २ जून रोजी या याचिकेवर सुनावणी होणार आहे.