मध्य प्रदेशमधील प्रसिद्ध उद्योगपती आणि पाथ इंडिया कंपनीचे संचालक पुनीत अग्रवाल यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच पुनीत अग्रवाल यांच्या कुटुंबावर काळाने घाला घातला आहे. अग्रवाल यांच्या पातालपानी येथील फार्म हाऊसवर नवीन वर्षानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या पार्टीमध्ये घडलेल्या अपघातात त्यांच्यासहीत त्यांची मुलगी, जावई, नातू आणि दोन नातेवाईकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
नेमके काय घडले?
मिळालेल्या माहितीनुसार, पुनीत हे नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी पत्नी, मुलगी, जावई आणि नातू यांच्यासह पानिपत येथील फार्महाऊसवर गेले होते. या फार्महाऊसमध्ये उभारण्यात आलेल्या एका टेहाळणी टॉवरमधील कॅप्सूल लिफ्टमधून खाली येत असताना अचानक त्या लिफ्टचा दोरा तुटला. लिफ्टचा दोरा तुटल्याने ती ७० फुटांवरुन खाली कोसळली. यामुळे लिफ्टमधील अनेकजण बाहेर फेकले गेले आणि त्यात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या अपघातामध्ये ५३ वर्षीय पुनीत, त्यांची २७ वर्षीय मुलगी पलक, २८ वर्षीय जावई पलकेश अग्रवाल, तीन वर्षाचा नातू नव यांच्याबरोबरच मुंबईतील पलकेश यांचे मेहुणे गौरव आणि ११ वर्षीय मुलगा आर्यवीर या सहा जणांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. या अपघातामध्ये गौरव यांची पत्नी निधी गंभीर जखमी झाल्या आहेत. या घटनेमध्ये जखमी झालेल्यांना चोईथराम रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे. या अपघातामध्ये सहा जणांचा मृत्यू झाल्याच्या वृत्ताला महू पोलिसांनी दुजोरा दिला आहे.
कोण आहेत पुनीत अग्रवाल
मध्य प्रदेशमधील सर्वात मोठ्या उद्योगपतींपैकी एक आहेत. पाथ इंडिया कंपनीबरोबरच ते एकूण १४ कंपन्यांचे संचालक होते. तसेच देशभरातील आठ राज्यांमध्ये टोल वसूल करण्याचे कंत्राट पुनीत यांच्या कंपनीकडे आहे. देशभरामध्ये पीपीपी तत्वावर बनवण्यात येणारे रस्ते बांधण्यात, त्यांचे नियोजन करण्यात पुनित यांनी पाथ इंडिया ही अग्रगण्य कंपनी आहे. तर या कंपनीने आत्तापर्यंत तीन हजार हायवेंचे बांधकाम केले आहे असून पुनित यांची एकूण संपत्ती १ हजार ९९२ कोटी इतकी असल्याची माहिती समोर आली आहे.
हेही वाचा – संजय राऊतांचं नक्की म्हणणं काय? फेसबुकवर म्हणाले, ‘संभाल के रखिये’!