देशाचे पंतप्रधान झाल्यानंतर काही महिन्यांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ऑल इंडिया रेडिओ अर्थात AIRवरून ‘मन की बात‘ हा विशेष कार्यक्रम सुरू केला. यामध्ये ते देशातल्या नागरिकांशी विविध मुद्द्यांवर संवाद साधतात. या कार्यक्रमाचे रविवारी ५० एपिसोड पूर्ण झाले. त्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशभरातल्या नागरिकांशी संवाद साधला. यामध्ये मोदींनी एक इंटरेस्टिंग गोष्ट नमूद केली. ‘मन की बात‘ची आयडिया मला जंगलामध्ये आली, असं मोदी या एपिसोडमध्ये म्हणाले आहेत.
‘ढाबेवाल्यानं अणुचाचणीबाबत मला मिठाई दिली‘
‘मन की बात‘मध्ये बोलताना मोदी म्हणाले, ‘१९९८ साली हिमाचल प्रदेशमध्ये एक भाजप कार्यकर्ता म्हणून मी दौऱ्यावर होतो. यावेळी मी तिथल्या जंगलामध्ये एका ढाब्यावर चहासाठी थांबलो. पण तिथल्या ढाबेवाल्याने मला चकितच केलं. त्याने मला चक्क मिठाई खायला दिली. तो म्हणाला मी आत्ताच रेडिओवर ऐकलं की भारताने आण्विक चाचणी केली आहे. रेडिओचा जितका प्रभाव लोकांवर पडतो तितका कदाचित इतर कोणत्याही माध्यमाचा पडत नाही.’
तुम्ही हे वाचलंत का? – माझ्या आईला राजकारणात का खेचता – नरेंद्र मोदी
‘आपली संस्कृती कायम राहणारी‘
यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रेडिओचं महत्त्व देखील विशद करून सांगितलं. ते म्हणाले, ‘जर एखाद्या नेत्याला ऐकणारे कोट्यवधी लोकं असतील, तर त्याला अजून काय हवं आहे? एका अभ्यासानुसार रेडिओ हे माध्यम अराजकीय आहे. मोदी येईल, मोदी जाईल. पण आपला देश, आपली संस्कृती ही कायम राहणारी आहे.’
‘मन की बात‘वर टीकाही झाली
‘मन की बात‘ या कार्यक्रमातून मोदींनी अनेक विषयांवर देशवासीयांशी संवाद साधला आहे. या कार्यक्रमाला लोकांचा आणि विशेषत: तरुण पिढीचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे. मात्र, जितकं यश या कार्यक्रमाला मिळालं, तितकीच टीकाही सहन करावी लागली आहे. प्रचारासाठी आणि प्रतिमा तयार करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी या माध्यमाचा, कार्यक्रमाचा वापर करत आहेत, अशी टीका अनेकदा त्यांच्यावर करण्यात आली आहे.