दिल्लीसह संपूर्ण उत्तर भारतात गेल्या काही दिवसांपासून उष्णतेची लाट सुरु झाली आहे. त्यामुळे या भागात दिवसा रेकॉर्ड ब्रेक उष्णतेची नोंद होत असल्याने त्याचा फटका नागरिकांना सहन करावा लागतोय. दिल्लीत कमाल तापमान 40 अंशाच्या पुढे जाऊ शकते आणि असे झाल्यास दिल्लीत उष्णतेचा 70 वर्षांचा विक्रम मोडीत निघेल असा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
मार्च महिन्यापासूनचं देशातील अनेक भागात उष्णतेने कहर केला आहे. यामुळे मुंबई, दिल्लीपासून हैदराबाद, राजस्थानपर्यंत नागरिकांना तीव्र उन्हाचा सामना करावा लागतोय. देशातील इतरही काही शहारांमध्ये उष्णतेने थैमान घातले आहे. परिणामी ज्यूस आणि आईस्क्रीमच्या दुकानांवर लोकांची गर्दी वाढच असून बाजारपेठांमध्ये देखील ठिकठिकाणी लिंबू सरबत, ताक आणि इतर थंड पेयांचे स्टॉल्स दिसू लागले आहेत. दरम्यान कुठेही पावसाचा अंदाज नसल्याने येत्या 10 दिवसात उष्णतेची ही लाट आणखी वाढू शकते असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे.
तीव्र उष्णतेच्या लाटेने विक्रम काढले मोडीत
दिल्लीत मार्च महिन्यात आतापर्यंतचे सर्वाधिक तापमान 32.7 अंशांवर पोहोचले आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार बुधवारी दिल्लीतील तापमान 40 अंशांवर पोहोचले. 2021 मध्ये सरासरी कमाल तापमान 33.1 अंश इतके नोंदवले गेले आहे. दिल्लीत गेल्या दशकानंतर सर्वाधिक उष्णता जाणवत आहे, कारण मार्च 2010 मध्ये तापमान 34.1 अंशांवर नोंदवले गेले होते. जो गेल्या 11 वर्षातील सर्वात उष्ण महिना होता.
पुढील काही दिवस पाऊसाची शक्यता नाही
हवामान खात्यानुसार, दिल्ली, राजस्थान, मध्य भारत, तेलंगणा, ओडिशा, छत्तीसगडमध्ये पुढील सात दिवस पावसाची शक्यता नाही. केरळ, कर्नाटकचा काही भाग आणि ईशान्येत फक्त थोडा पाऊस पडेल. म्हणजेच पुढील काही दिवस लोकांना उन्हापासून दिलासा मिळताना दिसत नाही.