सुनंदा पुष्कर मृत्यू प्रकरणात पतियाळा हाऊस कोर्टाने शशी थरूर यांना समन्स बजावले असून, ७ जुलै पूर्वी रोजी कोर्टात हजर राहण्यास सांगितले आहे. पत्नी सुनंदा पुष्कर मृत्यू प्रकरणात दिल्ली पोलिसांनी शशी थरूर यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल केले. यामध्ये कौटुंबिक हिंसाचार आणि आत्महत्येला प्रवृत्त केल्याचे आरोप थरूर यांच्यावर करण्यात आले आहेत. आरोपपत्र पाहिल्यानंतर कोर्टाने शशी थरूर यांना समन्स बजावून हजर राहण्यास सांगितले आहे. थरूर यांच्या विरोधात ३ हजार पानांचे आरोपपत्र दिल्ली पोलीसांनी दाखल केले आहे. शशी थरूर आणि सुनंदा पुष्कर यांचा नोकर नारायण सिंग हा या केसमधील एकमेव साक्षीदार आहे.
Sunanda Pushkar death case: Shashi Tharoor summoned by Patiala House court, asked to appear before it on July 7. #Delhi pic.twitter.com/9lukJXdXdx
— ANI (@ANI) June 5, 2018
काय म्हटले आहे आरोपपत्रात?
दिल्ली पोलिसांनी दाखल केलेल्या ३ हजार पानांच्या आरोपपत्रात शशी थरूर यांच्यावर भादंवि कलम ३०६ आणि ४९८ (अ) अंतर्गत कौटुंबिक हिंसाचारासह आत्महत्येला प्रवृत्त केल्याचे म्हटले आहे. यावेळी पोलिसांनी शशी थरूर यांच्या विरोधात योग्य ते पुरावे असल्याचे देखील स्पष्ट केले आहे. त्यामुळे सुनंदा पुष्कर मृत्यू प्रकरणात न्यायालय काय निकाल देणार? याकडे आता सर्वाचे लक्ष लागले आहे.
काय आहे सुनंदा पुष्कर प्रकरण
सुनंदा पुष्कर यांचा १७ जानेवारी २०१४ रोजी दिल्लीतील लीला हॉटेलच्या बाथरूममध्ये संशयास्पद मृत्यू झाला होता. मृत्यूपूर्वी त्रिवेदम ते दिल्ली विमान प्रवासात सुनंदा पुष्कर आणि शशी थरूर यांच्यात भांडण झाले होते. तसेच दिल्ली विमानतळावर देखील दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले होते. भांडणानंतर सुनंदा पुष्कर यांनी स्व:ताला हॉटेलच्या बाथरूममध्ये ४५ मिनिटे कोंडून घेतले होते. विमानतळावरील सीसीटीव्ही फुटेज दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्यानंतर केलेल्या चौकशीनंतर पोलिसांनी शशी थरूर यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल केले आहे. अद्याप तरी शशी थरूर यांना पोलिसांनी सुनंदा पुष्कर मृत्यू प्रकरणात अटक केलेली नाही.