पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची बुधवारी पंजाबमधील फिरोजपूर येथे होणारी सभा सुरक्षा यंत्रणेतील त्रुटीमुळे अचानक रद्द करण्यात आली. या घटनेचे पडसाद संपूर्ण देशभरात उमटले आहेत. आता या घटनेप्रकरणी गृहमंत्री अमित शहा यांनी तीन सदस्यीय समितीची स्थापना केली आहे. या समितीला या घटनेची लवकरात लवकर चौकशी करून अहवाल सादर करण्यास शहांनी सांगितले आहे. दरम्यान यापूर्वी पंजाब सरकारने देखील दोन सदस्यीय समिती चौकशी स्थापन केली आहे. यामध्ये निवृत्त न्यायमूर्ती मेहताब गिल आणि पंजाबच्या गृह विभागाचे प्रधान सचिव अनुराग वर्मा यांच्या अध्यक्षतेत समिती नेमली आहे. येत्या तीन दिवसात समितीने अहवाल सादर करणे अपेक्षित आहे.
गृहमंत्री अमित शहा यांनी स्थापन केलेल्या समितीमध्ये तीन सदस्य आहेत. या समितीचे नेतृत्व सुधीर कुमार सक्सेना (सचिव सुरक्षा – कॅबिनेट सचिवालय) करणार आहेत. तसेच त्यांच्यासह बलबीर सिंह (सहसंचालक, आयबी) आणि एस सुरेश (आयजी, एसपीजी) यांचा समावेश आहे.
यापूर्वी गृहमंत्री अमित शहा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सुरक्षेचा भंग झाल्यामुळे ट्वीट करून म्हटले होते की, गृहमंत्रालयाने पंजाबमध्ये पंतप्रधान मोदी यांच्या सुरक्षेत उल्लंघन झाल्याबाबत सविस्तर अहवाल मागवला आहे. पंतप्रधानांच्या दौऱ्यात सुरक्षा प्रक्रियेत असा निष्काळजीपणा पूर्णपणे अस्वीकार्य असून जबाबदारी निश्चित केली जाईल.
The Ministry of Home Affairs has sought a detailed report on today’s security breach in Punjab. Such dereliction of security procedure in the Prime Minister’s visit is totally unacceptable and accountability will be fixed.
— Amit Shah (@AmitShah) January 5, 2022
दरम्यान याप्रकरणी काँग्रेसच्या सुप्रिमो सोनिया गांधींना आढावा देण्यात आला. खुद्द पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी यांनी कॉल करत सोनिया गांधींना घडलेल्या घटनेबाबतची माहिती दिली. त्यानंतर खुद्द सोनिया गांधी यांनीही पंतप्रधानांच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त करत, चरणजीत सिंह चन्नी यांना काही सूचना केल्या आहेत. नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान आहेत, त्यांच्या सुरक्षेची काळजी पहिल्यांदा घ्या अशा शब्दात त्यांनी मुख्यमंत्र्यांना सूचना केल्या.
हेही वाचा – PM मोदींच्या सुरक्षेतील चुकीचं प्रकरण थेट सुप्रीम कोर्टात, CM चन्नींकडूनही चौकशी समिती गठीत