घरदेश-विदेशराहुल गांधी पाकिस्तानला मदत करत आहेत - रवीशंकर प्रसाद

राहुल गांधी पाकिस्तानला मदत करत आहेत – रवीशंकर प्रसाद

Subscribe

पंतप्रधान नरेंद्र मोदी चोर असल्याची खळबळजनक टीका काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी केल्यानंतर आता त्यावरून नव्या वादाला तोंड फुटलं आहे. भाजपनेही राहुल गांधी पाकिस्तानला मदत करत आहेत असा नवीन आरोप केल्यामुळे राफेल खरेदी घोटाळाच्याचं भूत पुन्हा एकदा भारताच्या मानगुटावर बसलं आहे.

एकीकडे राहुल गांधींनी ‘राफेल विमान खरेदी व्यवहारात मोठा घोटाळा झाला असून त्यात खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सहभाग आहे’, असा खळबळजनक आरोप केला असून, दुसरीकडे भाजपनेही राहुल गांधींना लक्ष्य करत त्यांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिलं आहे. यासंदर्भात केंद्रीय मंत्री रवीशंकर प्रसाद यांनी पत्रकार परिषद घेऊन राहुल गांधींच्या आरोपांचं खंडन करत उलट ‘राहुल गांधी देशाच्या शत्रूला मदत करत आहेत’, असा धक्कादायक आरोप केला आहे. त्यामुळे राफेल विमान खरेदी घोटाळ्याचं भूत पुन्हा एकदा भारतीय लोकशाहीच्या मानेवर येऊन बसल्याचं चित्र दिसून येत आहे.

होलँद यांच्या वक्तव्यावरून वाद

राहुल गांधी यांनी शनिवारी दुपारी पत्रकार परिषद घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींवर खळबळजनक आरोप केला. ‘देश का चौकीदार चोर है‘, अशा शब्दांत राहुल गांधींनी निशाणा साधला. फ्रान्सचे माजी राष्ट्राध्यक्ष फ्रॅन्कोइस होलँद यांनी केलेल्या एका वक्तव्यावरून हा सर्व वाद सुरू झाला. ‘राफेल खरेदी व्यवहार उद्योगपती अनिल अंबानी यांच्यामार्फतच करावा असे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच आपल्याला सांगितले होते’, अशा शब्दांत होलँद यांनी मोठा दावा केला होता. त्यानंतर राहुल गांधींनी वरील आरोप केला.

काय म्हणाले राहुल गांधी?

राफेल कराराच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अनिल अंबानी यांना तब्बल १ लाख ३० हजार कोटींचं गिफ्टच दिलं आहे. फ्रान्सच्या माजी राष्ट्राध्यक्षांनीच आपल्या पंतप्रधानांना चोर म्हटलं आहे, पण ते यावर मौन बाळगून आहेत. मोदींनी या आरोपांवर स्पष्टीकरण द्यावं. देशासाठी रक्त सांडणाऱ्या जवानांचा मोदींनी अपमान केलाय.

- Advertisement -

भाजपनं केला पलटवार

दरम्यान, राहुल गांधींची पत्रकार परिषद झाल्यानंतर अवघ्या काही वेळातच भाजपकडून रवीशंकर प्रसाद यांनी पत्रकार परिषद घेऊन या सर्व आरोपांचं खंडन केलं. शिवाय ‘राहुल गांधी भारताच्या शत्रू देशाची मदत करत आहेत’, असा धक्कादायक आरोपही त्यांनी केला.

‘सहा वर्षांपूर्वी म्हणजेच २०१२मध्ये काँग्रेसप्रणीत युपीए सरकारच्या काळामध्येच राफेल विमान खरेदीचा प्राथमिक करार झाला होता. २८ ऑगस्ट २००७ला डसॉल्ट एव्हिएशन आणि दुसऱ्या एका कंपनीने निविदा भरली होती. त्यात २०१२मध्ये डसॉल्टची निवड करण्यात आली. त्याच वर्षी रिलायन्सशी एमओयूही झाला होता’, अशा शब्दांत रवीशंकर प्रसाद यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. विमानांच्या किंमतीबद्दल बोलताना प्रसाद यांनी अधिक खुलासा केला आहे. ‘युपीएच्या काळात विमानांचा शस्त्रास्त्रांशिवायचा करार झाला होता. त्या करारापेक्षा ९ टक्के कमी किंमतीत शस्त्रास्त्रांशिवाय आणि २० टक्के किंमतीत शस्त्रास्त्रांसह खरेदी होईल’, असं प्रसाद यावेळी म्हणाले.

- Advertisement -

‘…म्हणून राहुल गांधींचा आग्रह’

दरम्यान, राहुल गांधींच्या आरोपांना उत्तर देतानाच प्रसाद यांनी त्यांच्यावर गंभीर आरोप देखील केले आहेत. ‘विमान खरेदीचा, त्याच्या किंमतीचा तपशील उघड करून राहुल गांधी पाकिस्तानला मदत करू इच्छित आहेत. ते शत्रूराष्ट्राच्या मदतीसाठी शस्त्रास्त्र खरेदीचा तपशील उघड करण्यासाठी आग्रह धरत आहेत’, असा थेट आरोप प्रसाद यांनी केला आहे. त्यामुळे आता यावरून नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -