गेल्या काही दिवसांपासून दक्षिण भारतातील काही राज्यांमध्ये मुसळधार पाऊस सुरू असल्यामुळे स्थानिक लोकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. तसेच मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान झाले आहे. बंगाल खाडीच्या दक्षिण पूर्व क्षेत्रात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्यामुळे सध्या दक्षिण भारतातील राज्यांना मुसळधार पावसाचा फटका बसत आहे. यामध्ये केरळ, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, कर्नाटक, पुडुचेरी यांचा समावेश आहे. तसेच महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये सुद्धा मुसळधार पाऊस पडत आहे. आता भारतीय हवामान खात्याने (IMD) केरळ, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, कर्नाटक, पुडुचेरी या राज्यांमध्ये पुढील ५ दिवस पावसाचा हाहाकार होणार असल्याचा इशारा दिला आहे. उद्यापर्यंत केरळमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.
महाराष्ट्रात येत्या २४ तासांत कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मेघर्गजनेसह वीजांचा कडकडात होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. आयएमडीच्या माहितीनुसार, कर्नाटकच्या दक्षिणेकडील भागात, आंध्र प्रदेश, केरळ आणि तामिळनाडू व्यतिरिक्त केंद्रशासित प्रदेश पुद्दुचेरीमध्ये पुढील ५ दिवसांमध्ये हलका ते जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. यादरम्यान तामिळनाडू आणि पुद्दुचेरीमध्ये २५, २७ नोव्हेंबरमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला गेला आहे. याशिवाय २७ नोव्हेंबरला आंध्र प्रदेशातील यनम आणि रायलसीमा व्यतिरिक्त दक्षिण किनारपट्टी भागात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच तामिळनाडूमध्ये २५-२६ नोव्हेंबरसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
हवामान खात्याच्या इशाऱ्यानुसार, २६, २७ नोव्हेंबरला तामिळनाडू आणि दक्षिण आंध्र प्रदेशच्या किनारी आणि अन्नारच्या खाडीवर तसेच नैऋत्य आणि लगतच्या पश्चिम-मध्य बंगालच्या खाडीत जोरदार वारे वाहण्याची शक्यता आहे. यादरम्यान ४०-६० किलोमीटर प्रतितास वेगाने वाहू शकतात. यामुळे मच्छिमारांना समुद्रापासून दूर राहण्याचा सल्ला दिला गेला आहे.
हेही वाचा – Nasaच्या शास्त्रज्ञांना सूर्याच्या पृष्ठभागावर दिसले मोठे छिद्र ; पृथ्वीला धोका पोहचण्याची शक्यता