देशातील कोरोनाबाधितांची संख्या कमी होत असल्यामुळे धार्मिक कार्यक्रम आणि पर्यटनास मुभा देण्यात आली आहे. मात्र यामुळे लोकांचा निष्काळजीपणा मोठ्या प्रमाणात वाढला आहे. पर्यटन स्थळावर आणि हिल स्टेशनवर लोकांची गर्दी होत असून या ठिकाणी कोरोना नियमांचे पालन होत नाही आहे. त्यामुळे काही दिवसांपूर्वी इंडियन मेडिकल असोसिएशनच्या (IMA) डॉक्टरांनी चिंता व्यक्त करत राज्यांनी धार्मिक कार्यक्रम, पर्यटनस्थळावरील प्रवास यावर बंदी घालावी. नाहीतर यामुळे कोरोनाची तिसरी लाट भयावह होईल, असा इशारा आयएमएने दिला होता. याच अनुषंगाने आता केंद्राकडून गर्दीच्या ठिकाणांवर नियंत्रण मिळवण्याच्या सूचना राज्यांना आणि केंद्रशासित प्रदेशांना देण्यात आल्या आहेत. याबाबत गृहसचिव अजय भल्ला यांचे एक पत्र जारी केले आहे.
Union Home Secretary Ajay Bhalla writes to Chief Secretaries and Administrators of State/UTs, urging them to issue strict directions to the district and other local authorities to regulate the crowded places and take necessary measures for the management of #COVID19. pic.twitter.com/3bNBTRtgO1
— ANI (@ANI) July 14, 2021
पर्यटन स्थळ आणि बाजार अशा गर्दीच्या ठिकाणी मास्क न घालणे आणि कोरोना नियमांचे उल्लंघन करण्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चिंता व्यक्त केली होती. त्यानंतर एका दिवसात सरकारने आज, बुधवारी राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना सूचना दिल्या आहेत. केंद्रीय गृह सचिव अजय भल्ला यांच्याद्वारे राज्य आणि केंद्रशासित प्रदेशाचे मुख्य सचिवासह प्रशासनाला सूचना जारी केल्या आहेत. कोरोना नियमांचे उल्लंघन करणाऱ्या विरोधात कठोर कारवाई करणे आणि गर्दीच्या ठिकाणांवर नियंत्रण मिळवणे, अशा सूचना केंद्राने दिल्या आहेत. कोरोना प्रतिबंधात्मक योग्य व्यवस्थापन सुनिश्चित करण्याचा सल्ला देखील राज्य सरकारांना देण्यात आला आहे.
‘तसेच राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना कोरोना संदर्भातील नियम कठोरपणे लागू करावे. जर कोरोना संबंधित योग्य पाऊल उचलले नाही तर अशा ठिकाणांवर पुन्हा बंदी घालण्यात येईल आणि उल्लंघन करणाऱ्यावर कारवाई केली जाईल. अजून कोरोनाची दुसरी लाट संपली नाही आहे’, असे केंद्राने म्हटले आहे.
हेही वाचा – अमेरिका फायझर, मॉडर्नाची लस पाठवण्यास तयार, मात्र भारताने यामुळे दिला नकार