अमिताभ आणि जया बच्चन ही जोडी बॉलीवूडमधील सर्वांचीच आवडती जोडी. या जोडीचे चित्रपटही बरेच आले. मात्र अमिताभ बच्चन यांच्यासाठी खास चित्रपट आहे तो म्हणजे ‘अभिमान’. या चित्रपटाला ४५ वर्ष पूर्ण झाली आहेत. याच चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या शेवटच्या शेड्युलमध्ये अमिताभ आणि जया हे लग्नबंधनात अडकले होते. त्यामुळंच अमिताभ यांच्यासाठी हा चित्रपट खास आहे. या चित्रपटाला ४५ वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं अमिताभ यांनी एक भावनिक ब्लॉग लिहिला आहे.
काय आहे अमिताभ यांचा ब्लॉग?
‘आमच्या ‘अभिमान’ चित्रपटाला २७ जुलै रोजी ४५ वर्ष पूर्ण झाली. या चित्रपटाच्या वेळी आमचं लग्न झालं नव्हतं. मात्र, चित्रपटाच्या शेवटच्या शुड्युलमध्ये आमचं लग्न झालं आणि या चित्रपटाचं संयुक्त निर्माण आमच्या सेक्रटरीकडे सोपवलं,’ असं अमिताभनं आपल्या ब्लॉगमध्ये लिहिलं आहे. बिग बी सोशलम मीडियावर नेहमीच अॅक्टिव्ह असून आपल्या आयुष्याबद्दल बऱ्याच गोष्टी पोस्ट करत असतात. या चित्रपटाचं दिग्दर्शन ऋषिकेश मुखर्जीनं केलं होतं. तर एका लोकप्रिय गायकाच्या आयुष्यातील चढउतार आणि आपल्यापेक्षा पत्नी वरचढ ठरत असताना जागृत होणाऱ्या अभिमानामुळं होणारी अवस्था या कथेवर आधारित ही कथा होती.
T 2879 – 45 years of ABHIMAAN .. !! the story, the music and Hrishikesh Mukherji .. everlasting ! pic.twitter.com/jEvk2IXgLX
— Amitabh Bachchan (@SrBachchan) July 27, 2018
‘अभिमान’चं संगीत आजही सुमधुर
‘अभिमान’ चित्रपटातील प्रत्येक गाणं त्यावेळी आणि आजही सुपरहिट आहे. ‘अब तो है तुमसे.. ‘, ‘तेरे मेरे मिलन की ये रैना.. ‘, ‘तेरी बिंदिया रे.. ‘, ‘पिया बिना पिया बिना.. ‘ और ‘मीत ना मिला रे मन का..’ ही सर्वच गाणी सुमधुर आणि अर्थपूर्ण आहेत. यासंदर्भातही अमिताभ यांनी आपल्या ब्लॉगमध्ये लिहिलं आहे. ‘आताच्या चित्रपटांमध्ये अशा स्वरुपाची ऐकू येत नाहीत. यातील प्रत्येक गाण्यावर दिग्गज एस. डी. बर्मन यांनी अप्रतिम काम केलं होतं. तर काही गाण्यांच्या रचनेच्या वेळी आपण बर्मन यांच्याबरोबर होतो,’ असं त्यांनी नमूद करत आठवणी जागवल्या. दरम्यान अमिताभ सध्या ‘ब्रम्हास्त्र’ चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त असून लवकरच त्यांचा तापसी पन्नूबरोबर ‘बदला’ चित्रपट प्रदर्शित होत आहे.