बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा विराट कोहलीसोबतच्या लग्नामुळे अनेकदा ट्रोल झाली आहे. मात्र तिचा चाहता वर्ग नेहमीच तिच्यामागे उभे असल्याचे पाहायला मिळाले. अशातच पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने विराट- अनुष्काच्या लग्नाविषयी भाष्य केलं आहे. यानंतर अनुष्का-विराटचे चाहते आता शोएबची शाळा घेत आहेत. अलीकडेच शोएब अख्तरने विराट कोहलीच्या अनुष्का शर्मासोबतच्या लग्नावर भाष्य करताना म्हटले की, अनुष्कासोबतच्या लग्नामुळे भारतीय फलंदाज विराट कोहलीच्या क्रिकेट करिअरवर परिणाम झाला आहे. दक्षिण आफ्रिकेतील भारताचा पराभव आणि त्यानंतर विराट कोहलीने सोडलेले कर्णधार पद यानंतरच शोएबने हे मत व्यक्त केलं आहे. विराटच्या खराब खेळीसाठी त्याचे लग्न कारणीभूत असल्याचे शोएबने म्हटले आहे.
विराट कोहली-अनुष्का शर्माच्या लग्नावर भाष्य करताना शोएब अख्तर म्हणाला, “विराट कोहलीने लग्न करण्याऐवजी १० ते १२ वर्षे क्रिकेटवर लक्ष केंद्रीत करायला पाहिजे होते. मी त्या जागी असतो तर मी लग्न केले नसते. मी धावा करुन क्रिकेटचा आनंद घेतला असता. हा 10 ते 12 वर्षांचा क्रिकेटचा काळ वेगळा असतो. पुन्हा येत नाही. लग्न करणं चुकीचे आहे अस माझं मत नाही, पण तुम्ही भारतासाठी क्रिकेट खेळताय तर तुम्ही त्याचा आनंद घेतला पाहिजे.” असं शोएबने एका मुलाखतीत सांगितले होते.
‘तो आता संघर्ष करतोय’
“कुटुंबात आल्यानंतर मुलांची जबाबदारी असते, दबाव असतो. यात क्रिकेटपटूंचे करिअर हे 14 ते 15 वर्षांचे छोट करिअर असते. यात पाच ते सहा वर्षे तुम्ही शिखरावर असता. विराटचा पाच ते सहा वर्षांचा काळ संपला असून तो संघर्ष करतोय. निवृत्त झाल्यानंतरचं कॅप्टनने लग्न करावे.” असंही शोएब म्हणाला.
शोएब अख्तरचे हे वक्तव्य आता सोशल मीडियावर चर्चेत आहे. विशेषत: अनुष्का शर्माच्या चाहत्यांना शोएबचे हे वक्तव्य मात्र अजिबात आवडले नाही. अनेक यूजर्स त्याला एकामागून एक टार्गेट करु लागले आहेत. एका यूजरने लिहिले, “लज्जास्पद. विराट कोहलीच्या वैयक्तिक आयुष्यावर भाष्य करून सर्वांचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र पाकिस्तानमधील नागरिक आणि क्रिकेटच्या दयनीय स्थितीबद्दल त्याने बोलले पाहिजे.
त्याचवेळी काहींनी शोएबला आठवण करून दिली की, “लग्नानंतर महेंद्रसिंग धोनी आणि कपिल देवसारख्या कर्णधारांनी क्रिकेटच्या मैदानात चांगली कामगिरी केली.” एका युजरने ट्विट केले “मी सांगतो. लग्नानंतर कपिलने WC 83 जिंकले. लग्नानंतर धोनीने WC 11 जिंकला…” अशा अनेक ट्विटच्या माध्यमातून शोएबला सतत लक्ष्य केले जात आहे. तर एका युजरने, “विराटच कुटुंब आणि त्याच्या व्यक्तीगत निर्णयांवर वादविवाद करु नको” असं म्हणत सुनावले आहे.