शोले चित्रपटात ‘कालिया’ ही भूमिका अजरामर करणारे जेष्ठ अभिनेते विजू खोटे यांचे आज वृद्धपकाळाने निधन झाले. त्यांच्या निधनाने बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे. १९६४ साली जेष्ठ अभिनेते विजू खोटे यांनी ‘या मालक’ या चित्रपटातून आपल्या कारकिर्दीला सुरूवात केली. एकामागून एक अशा ३०० हून अधिक चित्रपटात त्यांनी वेगवेगळ्या भुमिका केल्या. ‘अनोखी रात’, ‘जिने की राह’, ‘पगला कही का’, ‘रामपूर का लक्ष्मण’, ‘शरीफ बदमाश’, ‘जलते बदन’, ‘बेनाम’, ‘जुर्म और सजा’, ‘इन्सानियत’ या चित्रपटातील त्यांच्या भुमिका विशेष गाजल्या. बॉलिवूड आणि मराठी चित्रपटसृष्टीतील कलकारांनी श्रध्दांजली वाहिली.
Remembering Shri Viju Khote who did a wonderful social message film with Central Railway recently, passed away today morning. Here is the film. May his soul rest in peace.https://t.co/nmHDgT8t37
— Central Railway (@Central_Railway) September 30, 2019
विजू खोटे यांना मध्य रेल्वेने देखील अनोख्या पध्दतीने श्रद्धांजली वाहिली. ‘मध्य रेल्वेच्या व्हिडीओमार्फत जनसामान्यांत सामाजिक संदेश पोहोचवणाऱ्या विजू खोटे यांना भावपूर्ण श्रद्धांजली’, असं लिहित तो व्हिडीओ पोस्ट करण्यात आला. या व्हिडीओत भारतीय रेल्वे व त्याचे कर्मचारी यांचा आदर करण्याविषयीचा संदेश देण्यात आला आहे.
अभिनेते विजय खोटे यांनी आपल्या चतुरस्त्र अभिनयाने हिंदी-मराठी सिनेमा सृष्टीत वेगळी ओळख निर्माण केली होती. मराठी रंगभूमीबरोबर त्यांनी मराठी आणि हिंदी चित्रपटात दमदार भूमिका केल्या. भारतीय सिने इतिहासात विशेष नोंद केल्या गेलेल्या शोले सिनेमातील कालियाची भूमिका प्रेक्षकांच्या मनात कायमची कोरली गेली. ‘अशी ही बनवाबनवी’ सिनेमातील त्यांनी साकारलेली ‘बळी’ ही नकारात्मक भूमिकाही चांगलीच लक्षात राहिली. तसेच ‘अंदाज अपना अपना’मध्ये साकारलेला ‘रॉबर्ट’ही अनेकांच्या चांगलाच लक्षात राहिला. २०१८ साली प्रदर्शित झालेला जाने क्यूँ दे यारो हा त्यांचा अभिनेता म्हणून शेवटचा सिनेमा ठरला. त्यांच्या आज जाण्याने एक हरहून्नरी अभिनेता चित्रपटचसृष्टीने गमावला. खोटे अडनाव असले तरी तितकाच खरा असणारा माणूस आज आपल्यातून गेला अशीच भावना आज कलाकारांमध्ये आहे.