गुढी पाडवा किंवा हिंदू नववर्ष जगभरात अनेक लोक साजरे करतात. या प्रसंगी अनेक महाराष्ट्रीय लोक त्यांच्या जीवनात समृद्धी आणि आनंद आणण्यासाठी त्यांच्या दाराबाहेर किंवा खिडकीच्या बाहेर गुढी ठेवतात. यातच मराठी मालिकांमधील कलाकारांनीही त्यांचे गुढी पाडव्याचे प्लॅन शेअर केले आहेत.
‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ मधली तितिक्षा तावडे चा हा लग्नानंतरचा पहिला पाडवा आहे. “गुढीपाडवा हा मराठी संस्कृतीचा सर्वात महत्वाचा दिवस आहे आणि अर्थात तो मी खूप उत्साहात साजरा करणार आहे. लग्नानंतरचा पहिला पाडवा आहे माझा मी खास सुट्टी घेतली आहे. गुढीपाडवा साजरा करण्यासाठी मी सासरी जाणार आहे माझं सासर नाशिकच आहे. सिद्धार्थ आणि मी तिथे जाऊ आणि सुंदरशी गुडी उभारू, गोड खाऊ, सासू सासर्यांसोबत वेळ घालवू कारण ते नाशिकला असतात आणि आम्ही मुंबईमध्ये.
‘पारू’ मालिकेतील आदित्य म्हणजेच प्रसाद जवादे चा हा पहिला गुढीपाडवा आहे. “ह्यावेळेचा गुढीपाडवा बायको सोबत साजरा करायचा प्रयत्न आहे पण जर सुट्टी नाही मिळाली तर वीडीयो कॉलवर एकत्र गुढी उभारू. पण सुट्टीसाठी खूप प्रयत्न सुरु आहेत कारण लग्नानंतरचा पहिला पाडवा आहे. आम्ही हल्लीच ठाण्याला शिफ्ट झालो आहोत आणि आमच्या आवडत्या गोष्टीनी घर सजवले. माझी खूप इच्छा आहे की अमृताला एक छानशी साडी भेट देणार आहे. साताऱ्यातूनच ती खास साडी तिच्यासाठी घेऊन जाणार आहे. आमच्यासाठी सर्वात मोठी गोष्ट हीच असणार की आम्ही एकत्र असू त्या दिवशीचा स्वयंपाक आम्ही एकत्र मिळून बनवणार आहोत. पण वरण भात भाजी पोळी मी बनवणार. अमृताला वरण भात आणि त्यावर साजूक तूप खूप आवडत. संध्याकाळी सूर्यास्त बघायला तिला घेऊन जाणार आमची एक खास जागा आहे जेव्हा पासून आम्ही डेट करत होतो तेव्हा पासूनची.
‘शिवा’ मालिकेतील आशु म्हणजेच शाल्व किंजवडेकर ने सांगितले की मी शिवा आणि झी मराठीवरील इतर मालिकांचे कलाकार ह्यावर्षी डोंबिवलीच्या नववर्ष स्वागत यात्रेत सहभागी होणार आहोत आणि नंतर मालिकेतील माझ्या सहकलाकारांसोबत सेटवरच पाडवा साजरा करणार आहे. गुढीपाडव्याच्या दिवशी शूटिंग असणार तर सेटवरच सगळी तयारी आहे.
मीरा वेलणकर म्हणजेच ‘शिवा’ मालिकेतील सीताईने सांगितले,” गुढीपाडवा हा सण परिवारासोबत साजरा करणार आहे. मला १२ वर्षाचा मुलगा आहे त्याला आपल्या संस्कृती, परंपरा कळाव्यात म्हणून मी सण आवर्जून साजरे करते. गुढीपाडवाच्या दिवशी आपलं मराठी नव वर्ष सुरु होतं. जसं 31 डिसेंबरला आपण new year सेलीब्रेट करतो तसं मराठी नवीन वर्षाचे स्वागत आपण आपल्या पद्धतीने केलं पाहिजे. हल्ली आपण खूप वेगवान आयुष्य जगत आहोत आणि म्हणूनच आचारपद्धतीच्या मागचा अर्थ समजून घेऊन सण साजरा करावा हा माझा सर्वना आग्रह आहे . त्यामुळे गोष्टी अर्थपूर्ण होतात. कुठलीही गोष्ट साजरी करायची तर गोड -धोड तर हवंच. ह्या वर्षी आमच्याकडे आमरस पुरीचा बेत आहे.”