पालघरमध्ये एक संतापजनक घटना घडली. पालघरमध्ये घडलेल्या मॉब लिंचिंग घटनेवर चहूबाजूने टीका होत आहे. पालघर जिल्ह्यात जमावानं तीन प्रवाशांना चोर समजून दगडानं ठेचून हत्या केल्याच्या घटनेवर आता कलाकारही व्यक्त होऊ लागले आहेत. अभिनेता सुमीत राघवनने या घटनेवर संताप व्यक्त केला, त्यानंतर आता गीतकार जावेद अख्तर यांनी संताप व्यक्त केला आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये हत्या करणाऱ्यांना सोडू नका, असं त्यांनी म्हटलं आहे. जावेद अख्तर यांनी सोशल मीडियावर ट्विट करत त्यांचं मत मांडलं.
Those who are responsible for the lynching of the two seers and their driver should not be spared at any cost .There shouldn’t be any tolerance for a barbaric and heinous crime like lynching in a civilised society .
— Javed Akhtar (@Javedakhtarjadu) April 20, 2020
जावेद अख्तर यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, “पालघरमध्ये दोन साधू आणि गाडीचालकाच्या हत्येला जो जबाबदार आहे, त्यांना असं सहजासहजी सोडून द्यायला नको. एका पुढारलेल्या समाजात झुंडबळी सारख्या घोर अपराधाला कोणतीही जागा नसावी. आणि त्यांना सहिष्णुता दाखविण्याचीही गरज नाही”, असं जावेद अख्तर म्हणाले.
जावेद अख्तर समाजात घडणाऱ्या प्रत्येक घटनेवर व्यक्त होत असतात. या आधी पोलीस आणि डॉक्टरांवर झालेल्या हल्ल्याचा त्यांनी निषेध केला होता. त्यानंतर आता पालघर घटनेवर संताप व्यक्त केला आहे.
काय घडलं पालघरमध्ये?
गुरुवारी रात्री दहाच्या सुमारास दाभाडी-खानवेल जंगलातील मार्गावर नाशिककडून येणार्या एका कारला दादरा नगर हवेली केंद्रशासित प्रदेशाच्या सीमेजवळ गडचिंचले गावात गावकर्यांनी रोखले. या प्रवाशांकडे विचारपूस केल्यानंतर त्यांनी दिलेली उत्तरे समाधानकारक न वाटल्याने गावकर्यांनी दगड आणि व लाठी-काठ्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यांची गाडीही उलटी करून टाकली. बेदम मारहाण झाल्याने जखमी झालेले गाडीतील तीन जण जागीच मरण पावले. यावेळी सातशेहून अधिकचा जमाव जमला होता. पोलिसांना याची माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेतली. पण, संतापलेल्या जमावाने पोलिसांवरही हल्ला केला. यात पोलिसांच्या गाड्यांचे नुकसान झाले.