घरफिचर्सभाजप नीतीपुढे विरोधक गाफील

भाजप नीतीपुढे विरोधक गाफील

Subscribe

देशाच्या कानाकोपर्‍यात कुठेही भाजपविरोधात खुट्ट वाजले, तरी ममता तिथे धाव घेऊन जातात. त्यामुळे त्यांना पंतप्रधान पदाचे वेध लागलेत असा अनेकांचा समज झालेला आहे. पण वस्तुस्थिती तशी अजिबात नाही. ममतांना आपलाच बालेकिल्ला बंगालमध्ये आपल्यापेक्षा मोदींची लोकप्रियता वाढत असल्याच्या भयाने पछाडलेले आहे. म्हणून त्या बंगालबाहेरही मोदींवर टीका करण्यासाठी सवड काढून धावत असतात. ती दिल्लीत जाण्यासाठी नव्हे तर बंगालमध्ये टिकण्याची कसरत आहे.

गेल्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत भाजपने अतिशय योजनाबद्ध रितीने एका एका मताची जुळणी करून उत्तरप्रदेशात अभूतपूर्व यश मिळवले होते. त्यानंतर विरोधकांना आपल्या मतविभाजनाचा लाभ भाजपला मिळत असल्याचा साक्षात्कार झाला. ऐंशी टक्के जागा मिळवताना भाजपाने आपल्या मतांची टक्केवारी चाळीसच्या जवळपास नेवून ठेवली आहे. त्याला धक्का द्यायचा तर अखिलेशचा समाजवादी व मायावतींचा बसपा एकत्र यायला हवेत. पण त्यांची बेरीजही भाजपाला तुल्यबळ नाही. म्हणून त्यात अजितसिंग यांचे लोकदल आणि काँग्रेसलाही समाविष्ट व्हावे लागेल. ते जितके शक्य असेल तितकेच भाजपाला धक्का देणे शक्य आहे. पण त्यांचे एकत्र येणे आव्हानात्मक नसले तरी भाजपाला लोकसभेच्या ८० पैकी ७१ जागा एकहाती जिंकणेही सोपे नाही.

साहाजिकच कितीही जमेची बाजू असली, तरी ७१ पैकी किमान दहावीस जागा भाजपाच्या तिथे घटणार, हे अमित शहांचे गृहीत आहे. साहाजिकच तो घाटा अन्य राज्यांतून भरून काढण्याला पर्याय नाही. त्यासाठीच शहांनी पक्षाध्यक्षपदाची धुरा हाती घेतल्यापासून अनेक राज्यांत भाजपचा नव्याने विस्तार व पाया घालण्याचे काम हाती घेतले होते. म्हणूनच मागल्या दोन वर्षांत पारंपरिक विरोधकांना सोडून बंगालच्या मुख्यमंत्री ममता बानर्जी नगण्य वाटणार्‍या भाजपच्या मागे हात धुवून लागल्या आहेत. देशाच्या कानाकोपर्‍यात कुठेही भाजपविरोधात खुट्ट वाजले, तरी ममता तिथे धाव घेऊन जातात. त्यामुळे त्यांना पंतप्रधान पदाचे वेध लागलेत असा अनेकांचा समज झालेला आहे. पण वस्तुस्थिती तशी अजिबात नाही. ममतांना आपलाच बालेकिल्ला बंगालमध्ये आपल्यापेक्षा मोदींची लोकप्रियता वाढत असल्याच्या भयाने पछाडलेले आहे. म्हणून त्या बंगालबाहेरही मोदींवर टीका करण्यासाठी सवड काढून धावत असतात. ती दिल्लीत जाण्यासाठी नव्हे तर बंगालमध्ये टिकण्याची कसरत आहे.वास्तविक असे अनेक प्रश्न व समस्या आहेत, की ज्यामुळे ममतांना डाव्यांचा बालेकिल्ला उध्वस्त करून बंगालची सत्ता पादाक्रांत करण्यात यश आले. त्याचे कारण तिथे बांगलादेशी घुसखोर व मुस्लीम दहशतवाद लोकांना भेडसावत होता. त्याकडे मतपेढी म्हणून डावे किंवा काँग्रेस ढुंकून बघायला राजी नव्हते आणि ममतांनी तेच मुद्दे उचलून धरले. मग त्यांना अबोल मतदारांचा प्रचंड प्रतिसाद मिळत गेला. पण सत्तासुत्रे हाती आल्यावर त्यांनी त्या समस्यांना हात घातला नाही. कारण डाव्या पक्षांना ज्या दहशतीचा व घुसखोरीचा लाभ मिळत होता, तो देणार्‍या प्रवृत्ती आश्रयासाठी ममतांच्या वळचणीला आल्या. त्यांना मतदान करणार्‍यांचा पुरता भ्रमनिरास झाला. पण विरोधी पक्ष म्हणून काँग्रेस किंवा डावे त्या हिंदू बहुसंख्यांकांचे दुखणे मान्य करून लढायला राजी नव्हते.

- Advertisement -

साहाजिकच ममतांनी ज्यांना वार्‍यावर सोडून दिले होते, ते मतदार भाजपाकडे आशेने बघू लागले. केवळ ते मतदारच नव्हे, तर आज तृणमूल वा काँग्रेस व डाव्या पक्षांत असलेले अनेकजण तसे आहे़त. त्यांना कुठल्यातरी केंद्रीय वा राजकीय पक्षाचा आधार या दहशतवादाच्या विरोधात हवा आहे. अमित शहा व भाजपा यांनी त्याच मतदाराची मशागत करायचे काम हाती घेतले आणि बघता बघता भाजपची शक्ती बंगालमध्ये वाढलेली आहे. ते ओळखलेल्या ममतांनी संघर्षाचा पवित्रा घेऊन हिंदूंना भयभीत करण्यासाठी आक्रमक मुस्लीम नेत्यांपेक्षा हिंदूंवरच्या अन्यायाला रोखण्यासाठी सत्ता वापरली असती, तरी भाजपाला अपेक्षित प्रतिसाद मिळू शकला नसता. पण तसे केल्यास मतपेढीचे मॅनेजर असलेल्या काही मुल्लामौलवींचा रोष पत्करावा लागला असता. तिथेच ममता अडखळल्या आणि आज भाजपाने तळागाळापर्यंत मुसंडी मारलेली आहे. ती वरकरणी नजरेत भरणार नाही. पण मतदानाचे निकाल लागतील, तेव्हा बंगालचा त्रिपुरा झालेला दिसेल. याला उत्तरप्रदेशची तूट भरून काढणे म्हणता येईल.२००९ सालात असाच चमत्कार तृणमूलने घडवला होता आणि काँग्रेसला सोबत घेऊन लढताना डाव्यांना पाणी पाजले होते. दोन वर्षांनी विधानसभेत तर डाव्यांचे मुख्यमंत्री भट्टाचार्यांचाही पराभव झाला होता. पण तो होईपर्यंत कोणाला डाव्यांचा बालेकिल्ला डळमळला असल्याचा थांगपत्ता लागलेला नव्हता. नेमक्या त्याच स्थितीत आज बंगालचा भाजप आहे आणि म्हणून अमित शहा ४२ पैकी २२ जागा जिंकण्याची भाषा बोलत आहेत. किंबहुना त्यात किती तथ्य आहे, त्याची प्रचिती ममतांच्या वागण्या बोलण्यातूनच येत असते. ती अस्वस्थता मोदी सरकारविषयीची नसून बंगाल हातून निसटण्याची चिंता आहे. म्हणून मग हिंदूंना चुचकारणे व मुस्लिमांनाही लालूच दाखवणे, अशी दोन टोकाची कसरत ममतांना करावी लागते आहे.

आजही विधानसभेत डावे आणि काँग्रेस मोठे पक्ष असताना त्यापेक्षाही नगण्य असलेल्या भाजपाच्या विरोधात ममतांनी म्हणून सगळी शक्ती झोकून दिलेली आहे. यातला आणखी एक पैलू असा आहे, की तृणमूलचे अनेक दुय्यम व कनिष्ठ नेतेही ममतांना कंटाळले असून भाजपाच्या वाहत्या गंगेत उडी घ्यायला सज्ज बसलेले आहेत. सत्तांतराची नुसती चाहूल लागली तरी ममतांचा पक्ष उत्तरप्रदेशातल्या सपा बसपासारखा बारगळत जाण्याची शक्यता ममतांना भेडसावू लागली आहे. त्यांना दिल्लीतील मोदी सरकार पराभूत करण्यापेक्षा आपले बंगालचे राज्य टिकवण्याची चिंता लागलेली आहे. उलट मोदी-शहा उत्तरप्रदेश वा इतर उत्तर भारतीय राज्यातून भाजपाला येणारी २०-३० जागांची तूट बंगाल-ओडिशा अशा नव्या राज्यातून भरून काढण्यासाठी कामाला लागलेले आहेत. मतविभागणी शक्य नसल्याने आणखी एकदोन राज्यात नव्या ३०-४० जागा वाढवून आपले एकपक्षीय बहुमत टिकवण्याचे हे नियोजन शहांनी चार वर्षांपुर्वीच सुरू केलेले आहे. पण हात उंचावून अभिवादनात गुंतलेल्यांना त्याचे भान कुठे आहे?


-भाऊ तोरसेकर

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -