घरफिचर्सपेशवाईतील मुत्सद्दी नाना फडणवीस

पेशवाईतील मुत्सद्दी नाना फडणवीस

Subscribe

बाळाजी जनार्दन भानू उर्फ नाना फडणवीस किंवा नाना फडणीस हे पेशव्यांच्या दरबारी असणारे मराठा साम्राज्यातील मुत्सद्दी होते. त्यांचा जन्म १२ फेब्रुवारी १७४२ रोजी सातारा येथे झाला. नाना फडणवीस यांचे मूळ घराणे कोकणातल्या रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन येथील होते. बालवयातच नानासाहेब पेशव्यांच्या सानिध्यात आल्यामुळे त्यांना राज्य कारभाराचे शिक्षण मिळाले. वयाच्या २० व्या वर्षी थोरल्या माधवरावांकडून त्यांना फडणीशीची वस्त्रे मिळाली. एवढे मोठे पद नानांनी आपल्या कर्तृत्वाने आणि मुत्सद्दीपणाने सांभाळले. आपल्या चातुर्याच्या बळावर नानांनी राजकीय घडी बसवलीच होती, पण त्यांची कामाची तडफ, त्यांच्या वागण्यातला समतोलपणा या बरोबरच पेशवाई आणि राजसत्तेचा दबदबा आणि दरारासुद्धा त्यांनी वाढवला. इंग्रजांचा पाडाव करण्यातही ते यशस्वी झाले.

थोरल्या माधवराव पेशव्यांच्या मृत्यूनंतर पेशवाईची विस्कटलेली घडी महादजी शिंद्यांच्या मदतीने त्यांनी पुन्हा रुळावर आणली आणि दक्षिणेतील मराठी सत्तेचे वर्चस्व टिकवून ठेवले, पुण्याचे वैभव वाढवले. सवाई माधवराव पेशव्यांच्या अपघाती निधनानंतर सात-आठ महिने नानांनी तुरुंगवासही भोगला. संकटकाळात मराठ्यांची एकी टिकविणे व इंग्रजांपासून स्वातंत्र्यरक्षण करणे, ही नानांची महत्त्वाची कामगिरी होय. फ्रेंच राज्यक्रांती, इंग्रज-फ्रेंच युद्धे, अमेरिकन स्वातंत्र्ययुद्ध इ. घटना नानांना माहीत होत्या.

- Advertisement -

अखबारनवीसांची (बातम्या आणणार्‍यांची) प्रथा मराठ्यांच्या राज्यात अगोदरपासूनच होती. मराठी सत्तेचा हिंदुस्थानभर राज्यविस्तार झाल्यावर अखबारनवीसही प्रांताप्रांतांत ठिकठिकाणी नेमले गेले. प्रसिद्ध पानिपतच्या युद्धकाळात ‘बातम्या’ वेळेवर न मिळाल्याने मराठ्यांचे फार मोठे नुकसान झाले. नाना फडणवीस यांनी पानिपत प्रत्यक्षात पाहिले होते. यातूनच धडा घेऊन त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत अखबारनवीस आणि नजरबाज यांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढविली. या कारणामुळे नानांना हिंदुस्थानातीलच नाही तर परदेशातीलही बातम्या अत्यंत जलद कळत असत. प्रत्येक ठिकाणच्या बातम्या मिळविण्यासाठी नानांनी अतिशोधक आणि भेदतत्पर माणसे मिळविली होती.अशा या मुसद्दी फडणवीसांचे १३ मार्च १८०० रोजी निधन झाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -