घरफिचर्ससारांशपर्यावरणपूरक ‘विघ्नहर्ता’

पर्यावरणपूरक ‘विघ्नहर्ता’

Subscribe

वर्षांनुवर्षे होत असलेला प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्ती आणि रासायनिक रंगांचा वापर, त्यामुळे होणारं भरमसाठ जलप्रदूषण आणि भग्न मूर्तींचं विदारक दर्शन... हे चित्र अलीकडे काही प्रमाणात बदलायला सुरुवात झालीय. शाडूमातीच्या गणेशमूर्तींसोबतच मूर्तीदान आणि निर्माल्य संकलन अशा उपक्रमांमुळे पर्यावरणपूरक गणेशोत्सवाची चळवळ मूळ धरू लागलीय. अर्थात, त्यासाठी आता सरकारी पातळीवरुनही ‘पीओपी’ला हद्दपार करण्यासाठी ठोस निर्णयांची गरज आहे.

काही वर्षांपासून गणेशोत्सव साजरा करण्यामागील मूळ हेतू विस्मरणात जाऊन त्याला एखाद्या सोहळ्याचं स्वरुप आलंय. रोषणाई, आवाजाचा दणका हे सारं ओघाने त्यात आलंच. अर्थात, अनेक मंडळं आजही गणेशोत्सवादरम्यान समाजप्रबोधन, महागाई, रोगराईसारख्या समस्यांचं वास्तव नावीन्यपूर्ण देखाव्यांमधून सादर करत असतात. गणेशोत्सव आला की लाखो भक्त स्थापनेसाठी आकर्षक मूर्ती विकत घेण्यासाठी प्रयत्नशील असतात. त्यातून ही मूर्ती कशाची यापेक्षा ती किती देखणी आहे, याकडेच अधिक कल असल्यानं पीओपी (प्लास्टर ऑफ पॅरिस)च्या मूर्तींना अधिक मागणी असते. एका साच्यात पीओपी ओतायचं, मूर्ती तयार झाली की त्याला रासायनिक रंगांचा आकर्षक मुलामा चढवायचा एवढंच व्यावसायिकांचं काम असतं. त्यामुळे या मूर्ती शाडूमातीच्या मूर्तींपेक्षा स्वस्त आणि मस्त असतात. दुसरीकडे शाडूच्या मूर्तींच्या बाबतीत मात्र मूर्तीकाराला प्रत्येक मूर्तीसाठी स्वतंत्रपणे काम करावं लागतं. त्याची कला पणाला लागले. त्यामुळे साहजिकच मूर्तीसाठी किंमतही अधिक मोजावी लागते. परिणामी बहुतांश भाविक पीओपीच्या मूर्ती खरेदीला पसंती देत असतात.

गणेशोत्सव धुमधडाक्यात साजरा झाल्यानंतर खरा प्रश्न उद्भवतो तो, गणपती बाप्पांच्या विसर्जनावेळी. घरगुती आणि सार्वजनिक मंडळांच्या लाखो मूर्ती दरवर्षी नदी, नाले, समुद्र किंवा तलावांमध्ये विसर्जित केल्या जातात. मोठ्या शहरांतला हा विसर्जनसोहळा डोळ्यांचं पारणं फेडणारा असतो. वाजतगाजत लाडक्या बाप्पांना निरोप दिला जातो. या सोहळ्यानंतर काही दिवसांत जेव्हा पाणी ओसरतं तेव्हा मनोभावे पूजन केलेल्या त्याच मूर्ती भग्न झालेल्या नजरेस पडतात. मुंबई, नाशिक, पुणे, नागपूर अशी मोठी शहरं असो की लहान गावं… प्रत्येक ठिकाणी ही विदारक स्थिती असते. याची दुसरी बाजू म्हणजे अनेक शहरांमध्ये मूर्ती विसर्जित केल्यानंतर मोठ्या प्रमाणात जलप्रदूषण होऊन जलसृष्टीचं अस्तित्व आणि या पाण्यावर अवलंबून असलेल्या गावांवर संकट ओढावल्याचीही उदाहरणं आहेत. पीओपी पाण्यात विघटित होत नसलं तरीही मूर्तीवरचे रंग पाण्यात मिसळतात आणि त्यातून जलप्रदूषण होतं. याशिवाय देवाला आरतीवेळी दाखवला जाणारा नैवेद्य आणि मूर्तीपुढील निर्माल्यदेखील पाण्यात टाकले जाते. या वस्तू सडून जलप्रदूषणाचा प्रश्न अधिक गंभीर बनतो.

- Advertisement -

जलप्रदूषणाचा हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी गेल्या 5 ते 7 वर्षांत पर्यावरण क्षेत्रात कार्यरत संस्था आणि व्यक्तींनी व्यापक स्तरावर प्रबोधन केले. त्यानंतर शाडूमाती गणेशमूर्ती आणि मूर्तीदान संकल्पनेला बळ मिळालं. शैक्षणिक, राजकीय, सामाजिक आणि खासगी संस्थांनी पुढाकार घेत शाडूमातीच्या गणेशमूर्ती बनवण्याच्या कार्यशाळा घेतल्या. शाळांचाही त्यात मोठा सहभाग होता. त्यामुळेच लहानग्यांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांचाच पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला प्रतिसाद लाभला. याच सक्रिय सहभागामुळे शाडूमातीच्या मूर्तींना प्रचंड प्रतिसाद मिळतोय. म्हणूनच बुद्धीदात्या गणरायाचा हा उत्सव खरोखरच पर्यावरणावरचं विघ्न दूर करण्याच्या दिशेने वाटचाल करताना दिसतोय, ही बाब सर्वार्थाने महत्त्वाची ठरावी!

दरवर्षी लाखो मूर्तींचं दान
नाशिकमध्ये इतर शहरांप्रमाणेच गणेशोत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा होतो. त्यामुळे जलप्रदूषणाचा मुद्दाही नेहमीच कळीचा ठरलेला असतो. अशा परिस्थितीत मूर्ती आणि निर्माल्यदानासाठी महापालिकेने सामाजिक संस्थांच्या माध्यमातून पुढाकार घेतल्याने दरवर्षी हजारो टन निर्माल्य आणि लाखो मूर्ती संकलित होत असतात. 2015 सालात नाशिककरांनी 2 लाख 71 हजार गणेशमूर्ती दान केल्या होत्या. तर, 2017 सालात 1 लाख 69 हजार मूर्ती जमा झाल्या होत्या. याशिवाय 131 टन निर्माल्य संकलित झालं होतं. एकूणच गणेशभक्तांचं हे पाऊल निर्मळ गोदावरीसाठी निश्चितच महत्त्वाचं ठरतंय.

- Advertisement -

अंकुर गणेशाची किमया न्यारी
पर्यावरणपूरक बाप्पांची मूर्ती कुंडीत विसर्जित करायची आणि काही दिवसांनी त्यातून फुलझाडाचं रोपटं उगवेल, अशी नावीन्यपूर्ण संकल्पना नाशिकमध्ये चांगलीच रुजतेय. शहरात अनेक पर्यावरणप्रेमी, मूर्तीकारांनी ही संकल्पना पुढे आणलीय. त्याला नाशिककरांचाही चांगला प्रतिसाद लाभतोय. या संकल्पनेत काळ्या किंवा लाल अशा कोणत्याही मातीचा वापर करत गणेशमूर्ती तयार केली जाते. मूर्ती करतानाच त्यात फळ किंवा फुलझाडांचं बी टाकलं जातं. गणेशोत्सवानंतर कुंडीत किंवा परसबागेत मूर्ती ठेवून त्यावर पाणी टाकलं की दोन-तीन दिवसांत ही मूर्ती विरघळते आणि त्यातून अंकुर बाहेर येतात. ही संकल्पना पर्यावरणपूरक असल्याने त्याला चांगला प्रतिसाद लाभतोय. गेल्या वर्षी नाशिकमध्ये 8 हजारांवर अंकुर गणेशमूर्तींची विक्री झाली होती.

Prashant Suryawanshi
Prashant Suryawanshihttps://www.mymahanagar.com/author/sprashant/
गेल्या १६ वर्षांपासून नाशिकमध्ये प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. तंत्रज्ञानातील बदल, पर्यावरण, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर विपुल लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -