घरफिचर्ससारांशकुटुंबातील महिलांमध्ये असावा सुसंवाद

कुटुंबातील महिलांमध्ये असावा सुसंवाद

Subscribe

घर म्हटलं की भांड्याला भांडं लागणारच, असं आपण म्हणतो, पण या भांड्यांचा प्रमाणापेक्षा जास्त आवाज होणं आणि तो घराबाहेर जाणं कुटुंबासाठी धोकेदायक असतं. घरातील प्रत्येक गोष्ट सावरणं, सांभाळणं, जपणं हे त्या घरातील महिलेच्या हाती असतं. घरातील अनेक गोष्टी असतात ज्यात पुरुष काहीच करू शकत नाही आणि त्याला तेवढा वेळही मिळत नाही अथवा तो अनेकदा हतबल असतो. सगळ्यांना एकत्र धरून राहणं, कुटुंब टिकवणं यासाठी तो झटत असतो. घरातील पुरुष मंडळी घराची आर्थिक जबाबदारी घेतात. सगळं काही पुरवतात. काही कमी पडायला नको म्हणून मेहनत घेतात तसेच इतर अनेक बाबतीतील ताणतणाव पुरुषांवर असतोच.

— मीनाक्षी जगदाळे

घरातील महिलांमध्ये जर एकमत, एकोपा नसेल तर घराची दैना व्हायला वेळ लागत नाही. सगळे एकत्र एका घरात राहणारे असोत किंवा वेगवेगळे राहायला असोत, कोणत्याही नात्याने बांधलेल्या असोत महिला एकमताने असणे किती गरजेचे आहे आणि तसे नसल्यास काय होते हे आपण एका समुपदेशनला आलेल्या प्रकरणाच्या माध्यमातून पाहणार आहोत.

- Advertisement -

घरातील तीन भाऊ कमावते आणि तिघेही विवाहित असून त्यांच्याच घरात राहायला त्यांची घटस्फोट झालेली एक मोठी बहीण तिच्या दोन मुलांना घेऊन कायमस्वरूपी आलेली. त्यांच्यामध्येच राहायला अविवाहित असलेली अजून एक मोठी बहीण, धाकटी लग्नाची एक बहीण, तीन भावांच्या तीन बायका, त्यांची मुलं-मुली आणि आई असं हे कुटुंब.

घरातीत महिलांचे कोणत्याही गोष्टीवर एकमत नसणे, बहिणींचा ग्रुप वेगळा, तीन सुनांचा ग्रुप वेगळा, त्यात परत प्रत्येक नवरा-बायको त्यांची मुलं हा ग्रुप वेगळा असे घरातच अनेक ग्रुप झाले होते. प्रत्येकाचे विचार, सवयी, वागणूक, स्वभाव नानाविध प्रकारचे होते.

- Advertisement -

आत्या, काकू, आजी, आई या सगळ्यांनी मुलांना भेदभाव शिकवलेला, बायकांनी नवर्‍यांचे एकमेकांबद्दल कान भरलेले, तोंडावर गोड बोलणे, सतत पाठीमागे एकमेकींची निंदा करणे, सासरच्या घरात घडलेल्या गोष्टी प्रत्येक सुनेने आपल्या माहेरी सांगणे, त्यावर तिघी सुनांच्या माहेरावरून विविध सल्ले यामुळे घरातील महिला ज्यांची संख्या घरातील पुरुष माणसांपेक्षा जास्त होती त्यांच्यात सतत कुरबुरी होऊ लागल्या होत्या. तिघेही भाऊ नोकरी-व्यवसायानिमित्ताने दिवसभर घराबाहेर असल्यामुळे घरात रोज काय घडतं याबद्दल त्यांना जास्त माहिती नव्हते.

यातील दोन भाऊ जेव्हा समुपदेशनासाठी, मार्गदर्शनासाठी आले होते तेव्हा हे कुटुंब आता मागील काही वर्षात घडलेल्या घडामोडींमुळे किती भावनिक, मानसिक, आर्थिक, शारीरिक त्रासातून जात आहे हे निदर्शनास आले. त्यांच्या सांगण्यानुसार वारंवार घरात नणंद भावजयांमधील होणारा वाद, बहिणींनी एकत्र येऊन सतत भावाच्या बायकांना टोमणे मारणे, सतत भाच्यांना उलटसुलट बोलणे, त्यातून वाद होणे यामुळे घरातील मुलं या गोष्टीला कंटाळून घरापासून लांब राहून शिक्षण घेत होती.

घटस्फोटित बहीण जी भावांच्या घरात राहत होती तिला वाटू लागले भावांनी स्वतःची मुलं चांगल्या ठिकाणी शिकायला ठेवलीत आणि माझ्या मुलांवर खर्च नको म्हणून त्यांना इथेच राहू दिलं. अजून एक गोष्ट म्हणजे घरकामावरून, शेती कामावरून भांडण. अविवाहित आणि घटस्फोटित बहीण या दोघींची मानसिकता अशी झाली होती की आम्हाला मुद्दाम जास्त काम दिलं जातं. समुपदेशनादरम्यान भावांच्या सांगण्यानुसार खरंतर असं काहीच नव्हतं. त्यांच्या बायका बर्‍यापैकी शिकलेल्या असल्यामुळे बाहेर कामाला जात होत्या, तर कोणी स्वतःचा व्यवसाय करीत होत्या. घटस्फोटित आणि अविवाहित दोन्ही बहिणी तितक्या सुशिक्षित नसल्याने त्यांच्यावर घरकामाची, शेतीची जबाबदारी पडत होती.

या वातावरणामुळे मोठा भाऊ त्यातल्या त्यात जास्त उत्पन्न असल्यामुळे स्वतःच्या हिमतीवर चांगला सेटल होऊ शकत असल्याने स्वतःची बायको घेऊन रोजच्या कटकटीला कंटाळून वेगळं निघून स्वतंत्र घर घेऊन राहू लागला होता. धाकट्या भावाची बायको जास्त शिकलेली, सुशिक्षित माहेर असलेली असल्यामुळे स्वतःचा व्यवसाय तसेच करिअर करण्याची प्रबळ इच्छाशक्ती असल्यामुळे घरकाम, जुनाट विचार, नंदांची अपमानास्पद बोलणी ऐकून घ्यायला, सासूचा सासूरवास सहन करायला अजिबात तयार नव्हती. तिने घरात हे समजावण्याचा खूप प्रयत्न केला,पण तिला यश आलं नव्हतं. तिच्या नवर्‍याला वेगळं निघून राहण्याइतपत उत्पन्न नसल्याने आणि मुळात कुटुंब तोडायची इच्छा नसल्याने तोही हतबल होता. कोणताच निर्णय घेऊ न शकल्यामुळे त्याची बायको सहा महिन्यांपासून माहेरी निघून गेली होती. मुलांची अ‍ॅडमिशनही तिने माहेरीच करून घेतली होती. नवर्‍याला तिने फारकतीसाठी कायदेशीर नोटीस पाठवली होती.

या कुटुंबातील वादविवाद त्यांच्या समाजात, नातेवाईक यांच्यात पसरल्यामुळे धाकट्या बहिणीचे लग्न जमत नव्हते. तिचे वय वाढत चालले होते आणि त्यामुळे तिची चिडचिड होऊ लागली होती. या सर्व घडामोडींचा मनस्ताप झाल्यामुळे आई जास्त आजारी पडली होती आणि तिची जबाबदारी घ्यायची कोणी, तिचा औषधोपचार खर्च उचलायचा कोणी, तिला सांभाळायचं कोणी यामुळे आता अजून मतभेद होऊ लागले होते.

मधल्या भावाची मुलगी जी घरातील या वातावरणाला कंटाळून बाहेरगावी शिकायला ठेवली होती, तिने नुकताच घरात कोणाला न सांगता आंतरजातीय प्रेमविवाह परस्पर करून घेतला होता. हे घरात समजलं तेव्हा सगळ्यांना धक्का बसला होता. घरातील भांडणामुळे ती बाहेर शिकायला गेली. दूर असल्यामुळे तिचं असं झालं. मुलगी हातातून गेली, असं सगळे नातेवाईक बोलत होते. सगळे एकत्र होते तोपर्यंत एकमेकांच्या उत्पन्नाचा एकत्रित वापर करून सगळं कुटुंब व्यवस्थित सुरू होतं. आता मात्र धाकट्या भावाच्या बायकोने त्याच्यावर कोर्टात केस टाकल्याने त्याचा कोर्टकचेरीचा अनाठायी खर्च, आईच्या आजारपणाचा खर्च, दोन्ही निराधार बहिणींचा खर्च यामुळे तिन्ही भावांना एकत्र निर्णय घेऊन शेती विकायला लागली होती आणि त्यातून सगळं भागवण्याची धडपड सुरू होती.

घरातील दोन सुना मोठी आणि धाकटी घराबाहेर पडल्यामुळे मधल्या भावाची बायको मात्र तीन नणंदा आणि सासूच्या कचाट्यात सापडली होती. तिच्यावर घरातल्या, बाहेरच्या सर्व जबाबदार्‍या पडल्यामुळे तिचे नवर्‍याशी भांडण करण्याचे प्रमाण वाढले. रोज पत्नीकडून होणार्‍या या मानसिक त्रासामुळे मधल्या भावाला बीपीचा त्रास, ट्रीटमेंट, औषधं, तपासण्या, पर्यायाने नवीन खर्च सुरू झाला होता.

दोन्ही भाऊ पूर्ण खचले होते. मोठ्या भावाने सगळ्यातून अंग काढून घेतले होते. धाकटा भाऊ पत्नी, मुलं यांच्यापासून दुरावला होता, तर मधल्याची पत्नीही आदळत आपटत संसार रेटत होती. तिच्या माहेरील परिस्थिती गरिबीची, आईवडील वारलेले असल्यामुळे तिला पर्याय नव्हता म्हणून ती राहते, असं मधला भाऊ सांगत होता. तिन्ही भावांना सगळ्या घरातील महिलांकडून ज्या अपेक्षा होत्या त्या या दोघांनी जेव्हा बोलून दाखवल्या तेव्हा लक्षात आले की त्यांचा किती मोठा भ्रमनिरास झाला होता.

दोघे भाऊ सांगत की, आम्ही घरातील बायकांना सांगायचो तुम्ही एकमेकींच्या ज्ञानाचा, अनुभवाचा वापर चांगलं काही करण्यासाठी करा. तुम्ही एकत्र येऊन एखादा गृहउद्योग सुरू करा. ज्या शिकलेल्या सुना आहेत त्या मार्केटिंग बघतील. घरातील कामे वाटून घ्या. पुरुष असूनही महिलांबद्दल त्यांची ही स्वप्ने होती, पण केवळ आपलंच खरं करण्याच्या नादात सगळ्याच महिलांनी स्वतःचं नुकसान करून घेतलं होत. यावरून घरातील महिला मंडळ एकीने, निकोप आणि शुद्ध मानसिकतेने एकत्र असणे किती आवश्यक आहे हे लक्षात घ्यावे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -