घरफिचर्ससारांशइ है बम्बई नगरिया तू देख बबुआ!

इ है बम्बई नगरिया तू देख बबुआ!

Subscribe

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ मुंबईला आले. मुंबईत त्यांनी देशातील बड्या उद्योजकांशी चर्चा केली. उत्तर प्रदेशात गुंतवणूक यावी यासाठी त्यांचा हा दौरा होता हे सर्वश्रूत. त्याशिवाय योगींना उत्तर प्रदेशात फिल्मसिटी उभारायची आहे. त्यासाठीही ते बॉलिवूडच्या दिग्गजांना भेटले. त्यामुळे आदित्यनाथ मुंबईची फिल्मसिटी उत्तर प्रदेशात नेतात की काय अशी शंका प्रत्येकाच्याच मनात दाटली आहे. फिल्मसिटी खिशात घालून नेण्यासारखी बाब नसली तरी बेसावध राहून अजिबात चालणार नाही.

मुंबई गं नगरी बडी बांका
जशी रावणाची दुसरी लंका
वाजतो गं डंका,
डंका चहुमुलखी रहाण्याला गुलाबाची फुल्की
पाहिली मुंबई…

मुंबईचे इतके सुंदर वर्णन शाहीर पठ्ठेबापूरावांनी केले आहे. ही लावणी १९१० च्या सुमारास लिहिली गेली, तेव्हाच ‘रावणाच्या लंके’शी मुंबईचे साम्य दिसायला लागले होते, पण मुंबई नगरीला तिच्या समृद्धीमुळे दृष्ट लागते की काय अशी भयशंका आता महाराष्ट्रातल्या प्रत्येकालाच डाचू लागली आहे. निमित्त आहे योगी आदित्यनाथ यांच्या नुकत्याच झालेल्या दौर्‍याचे. उत्तर प्रदेशात जागतिक स्तरावरील फिल्मसिटी उभारण्याची योजना त्यांनी दोन वर्षांपूर्वी मुंबईत येऊन जाहीर केली होती. नोएडा येथे एक हजार हेक्टर जमिनीवर ही फिल्मसिटी उभारण्यात येत आहे. त्यासाठी त्यांनी चित्रपटसृष्टीतील तज्ज्ञांसोबत चर्चाही केली. दोन वर्षांनंतर मुंबईत पुन्हा येऊन त्यांनी अक्षय कुमारसह चित्रपटातील अनेक कलाकारांशी चर्चा केली. योगींनी अशी फिल्मसिटी उभारावी. त्यातून त्यांच्या राज्याचा विकास झाला तर हरकत नाही, पण मुंबईत येऊन त्यांनी फिल्मसिटी उभारण्यासाठी हालचाली कराव्यात यात त्यांचा अंतस्थ हेतू लक्षात येतो.

- Advertisement -

त्यांच्या भूमिकेमागे नक्की काय कारस्थान दडलंय हे आता स्पष्टपणे दिसू लागले आहे. सुशांतसिंग आत्महत्येप्रकरणी गेल्या दोन वर्षांपासून काही मंडळींनी जो थयथयाट मांडला आहे त्यामागचे सुप्त कारण योगी यांच्या हालचालींतून आता स्पष्टपणे दिसतंय. मुंबईतून बॉलिवूड पळवून नेण्यासाठी तर हा उपद्व्याप नाही ना, अशीही शंका यानिमित्ताने उपस्थित होते. कंगना रानौतने ‘क्लीन अप’ बॉलिवूडची केलेली भाषाही याच मालिकेतील एक भाग असल्याचे आता समजावे लागेल. सुशांतसिंग आत्महत्या प्रकरण हे दुर्दैवी होते आणि पोलीस यंत्रणांनी त्याच्या मुळाशी जावे ही प्रत्येकाचीच अपेक्षा आहे, पण या प्रकरणाआडून जर उत्तर प्रदेशची पोळी भाजण्याचा प्रयत्न कुणी करणार असेल तर ते मराठी माणूस कसे सहन करणार? यापूर्वीदेखील बुलेट ट्रेन, समृद्धी मार्ग आणि तत्सम दळणवळणाच्या माध्यमातून मुंबईतील उद्योग गुजरातला पळवण्याचा प्रयत्न लपून राहिलेला नाही.महाराष्ट्रातील उद्योग गुजरातमध्ये घेऊन जाण्याचा प्रयत्न २०१४ पासूनच होत आहे.

आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र असेच षड्यंत्र रचून गुजरातला नेले गेले. अशात आता शंभर वर्षाची परंपरा असलेल्या बॉलिवूडला पळवण्याचा डाव योगींच्या माध्यमातून रचला जात आहे. त्याला महाराष्ट्रातून विरोध होणे हे स्वाभाविकच आहे. उत्तर प्रदेशात आम्ही सुरक्षिततेच्या वातावरणात फिल्मसिटीचे काम करू, असेही योगींनी सांगितले. मुळात ज्या उत्तर प्रदेशात सातत्याने गुन्हेगारीच्या घटना घडतात तेथे सुरक्षिततेची हमी तेथील पोलीस यंत्रणा तरी घेणार का? गुंडापुंडांचा प्रदेश म्हणून ज्या प्रदेशाला ओळखले जाते तेथे चित्रपटसृष्टी उभारून नक्की साध्य काय होणार? नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोने जारी केलेल्या माहितीनुसार देशात सर्वाधिक गुन्हेगारीच्या घटना उत्तर प्रदेशात होतात. या राज्यात प्रत्येक दोन तासांनी बलात्काराच्या घटनेची पोलिसांत नोंद होते. प्रत्येक ९० मिनिटांनी एका बालकाच्या विरुद्ध गुन्हा घडल्याची सूचना दिली जाते.

- Advertisement -

देशातील एकूण खुनांच्या घटनांपैकी तब्बल १३.८ टक्के घटना केवळ उत्तर प्रदेशात घडतात, तर महिलांवरील अत्याचाराच्या घटना १५.७ टक्के इतक्या एकट्या उत्तर प्रदेशात घडतात. याशिवाय प्रत्येक गुन्ह्याच्या प्रकारात उत्तर प्रदेश अव्वल आहे. हे गुन्हे रोखण्यासाठी योगी सरकार प्रयत्न करतेय ही स्वागतार्ह बाब आहे, पण म्हणून आपल्या राज्यात गुन्हेगारीच नाही अशा अविर्भावात सुरक्षित वातावरणाच्या पोकळ गप्पा मारून नेमके साध्य काय होणार? योगींच्या वक्तव्यावर क्षणभर विश्वास ठेवायचा जरी झाला तरीही ते मुस्लीम कलाकारांना बॉलिवूडप्रमाणे साथ देतील का? त्यांच्या मनातील मुस्लीमद्वेष फिल्मसिटीसाठी तरी किमान कमी होईल का, हेदेखील बघणे महत्त्वाचे आहे. विशिष्ट लोकांना पुढे घेऊन जाताना काहींवर अन्याय करायचा असा जर या फिल्मसिटीत न्याय दिला जाणार असेल तर तेथे कोण जाणार? बॉलिवूडमध्ये एखादा चित्रपट तयार होताना सर्वधर्मियांना कामे मिळतात. मुळात माणसांचा धर्म बघून नाही तर त्यातील गुणवत्ता बघून येथे कामे दिली जातात. त्यामुळे सर्वधर्मसमभाव असलेली ही एकमेव इंडस्ट्री आहे, असे म्हटले तर वावगे ठरू नये.

गेली शंभराहून अधिक वर्षे विकसित होत असलेली बॉलिवूड ही एक संकल्पना आहे. तिची स्वतंत्र अशी कार्यसंस्कृती आहे. ब्रिटिशांच्या काळात मुंबईत या संकल्पनेची रुजवात घालण्यात आली. त्यानंतर चित्रपट निर्मात्यांसाठी मुंबई ही नेहमीच तांत्रिकदृष्ठ्या आधुनिक आणि सांस्कृतिकदृष्ठ्या सोयीची नगरी राहिली आहे. फाळणीच्या विदारक अनुभवातून आपला देश गेला. त्यानंतर तर या चित्रपटसृष्टीने चक्क तग धरला. अभिनेते, दिग्दर्शक, कॅमेरामन याप्रमाणेच मेकअपमन, लाईटमन, स्पॉट बॉय, साऊंड आर्टिस्ट, डबिंगवाले, वादक, संगीतकार, डमी, एक्स्ट्रामधले कलाकार असे मिळून जवळपास पाच ते सहा लाख लोकांना थेट रोजगार देणारा हा उद्योग आहे. त्यामुळेच बॉलिवूडला मुंबईचा अविभाज्य भाग मानले जाते. भौगोलिक, सामाजिक आणि सांस्कृतिक कारणेही बॉलिवूडच्या कार्यसंस्कृतीत रुजलेली आहेत. कुण्या मुख्यमंत्र्याला किंवा धनवंत उद्योजकाला वाटले म्हणून हलवता येण्यासारखी ती वस्तू नव्हे. अर्थात यापूर्वीच्या अशा प्रयत्नांमुळे वा प्रयोगांमुळे बॉलिवूडची प्रतिष्ठा कमी झाली, असेही म्हणता येणार नाही. हैदराबादमध्ये रामोजी सिटी उभी राहिली.

मॉरिशसच्या सरकारने भरघोस सवलती जाहीर करून हिंदी चित्रकर्मींना आमंत्रण दिले, पण तरीही बॉलिवूडने आपले अस्तित्व गमावले नाही. कारण बॉलिवूडची पाळेमुळे मुंबईत पसरलेली आहेत. शंभर वर्षांपेक्षा अधिक काळापासून ही पाळेमुळे मजबुतीने टिकून आहेत. ती टिकून राहण्यासाठी अनेकांनी घाम गाळला आहे. केवळ हिंदी चित्रपटसृष्टीच नव्हे तर मराठी, गुजराती, भोजपुरी, दाक्षिणात्य, बंगाली भाषेतील मनोरंजन क्षेत्रालाही कवेत घेण्याची ताकद बॉलिवूडमध्ये आहे. इतकेच नाही तर यूपी, बिहारमधील अनेक कलावंतांना बॉलिवूडने प्रतिष्ठा प्राप्त करून दिली आहे. या कलाकारांनीही बॉलिवूडप्रति कधी अपशब्द वापरले नाहीत. याउलट बॉलिवूडवर संकट आले तेव्हा ते झेलण्यासाठी हे कलाकार अग्रभागी होते. असंख्य मालिकांचे चित्रीकरणही याच बॉलिवूडच्या भरवशावर चालते. दादासाहेब फाळकेंसारख्या प्रतिभावंताने चित्रसृष्टीची मुहूर्तमेढ रोवली. त्यानंतरही या चित्रपटसृष्टीचा समृद्ध इतिहास आहे. तो कुणा एका-दोघांच्या प्रयत्नाने पुसला जाणे कदापिही शक्य नाही, पण यानिमित्ताने राजकीय मंडळींचा महाराष्ट्रद्वेष समोर येतोय हेदेखील मान्य करावे लागेल.

कोरोनाच्या काळात बॉलिवूडमधील श्रमिकांसाठी महाराष्ट्र शासनाने काय केले होते, असाही सवाल काहींनी केला होता. वास्तविक कोरोनाच्या काळात परिस्थितीचे चटके बसले नाहीत असे एकही क्षेत्र सापडणार नाही. त्याला बॉलिवूड कसे अपवाद असणार? पण म्हणून बॉलिवूडमधील श्रमिकांना शासनाने वार्‍यावरही सोडलेले नाही. शिवाय अनेक अशा सामाजिक संस्था होत्या ज्या श्रमिकांसाठी धावून आल्या. गेल्या दोन वर्षांपासून बॉलिवूड प्रचंड मोठ्या आर्थिक संकटाशी लढत आहे. कोरोनामुळे निर्माण झालेल्या या संकटाची सुरुवात तेव्हा झाली होती जेव्हा मल्टिप्लेक्स आणि थिएटर्स बंद ठेवण्याचे आदेश निघाले होते. त्यातून हजारोंना बेरोजगारीचा सामना करावा लागला. सोशल डिस्टन्सिंगच्या नियमामुळे चित्रपटांचे चित्रीकरणही या काळात थांबले होते. परिणामी या काळात चित्रपट प्रदर्शित होऊच शकले नाहीत. त्याचा आर्थिक फटका या क्षेत्राशी संबंधित घटकांना बसतोय. त्यातून सावरण्यासाठी आता प्रयत्न सुरू झालेत, पण अशातच योगींच्या मुंबई दौर्‍याने बॉलिवूडकरांच्या चिंतेत वाढ केली. ‘मुंबईतील फिल्मसिटी नेण्याचा आमचा विचार नाही.

आम्ही स्वत: नवीन फिल्मसिटी करतोय,’ असे सांगून योगींनी चर्चांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला, परंतु यातून संकट पुसले गेले असे मुळीच होणार नाही. ज्यावेळी नवीन फिल्मसिटीसाठी उत्तर प्रदेशात भरघोस सवलती दिल्या जातील, त्यावेळी मुंबईतील अनेक मंडळी बोर्‍याबिस्तरा बांधायला सुरुवात करू शकतील. स्टिल कंपन्यांच्या बाबतीत नाशिक शहराने असाच अनुभव घेतला आहे. नागपूर शहरातील उद्योगांना वीज दरात सवलत दिल्यानंतर नाशिकमधील ८० टक्के स्टिल कंपन्या नागपुरात स्थलांतरित झाल्या. गुजरातमध्ये गेलेले वेदांता-फॉक्सकॉन, टाटा एअरबस यांसारखे मोठे प्रकल्प गुजरातमध्ये जाण्याचे मुख्य कारणही तेथे उद्योग वाढीसाठी दिल्या जाणार्‍या सवलती हेच आहे.

त्यामुळे महाराष्ट्रातील प्रकल्प पळवण्यासाठी ही मंडळी कोणत्याही थराला जाऊ शकतात. असेच फिल्मसिटीच्या बाबतीत होणार नाही याची शाश्वती कोण देणार? त्यामुळे आता महाराष्ट्र शासनाला पुढाकार घ्यावा लागेल. वेगवेगळ्या योजना राबवून आतापासूनच मुंबईतील चित्रपट उद्योगांना बळ द्यावे लागेल. त्यासाठी अनुभवी कलाकारांशी सातत्याने चर्चा करावी लागेल. अर्थात कुणी कितीही प्रयत्न केले तरीही मुंबादेवीच्या आशीर्वादाने विकसित झालेल्या या मायानगरीचे काहीएक बिघडणार नाही. यासाठी समस्त मुंबईकर विशेषत: येथील मराठी माणूस व महाराष्ट्र् पहारा ठेवून आहे.

डॉन चित्रपटातील उत्तर भारतीयांच्या भाषेतील गाण्याचा संदर्भ देणे येथे क्रमप्राप्त ठरतो. हे गाणे कमालीचे गाजले…

ई है बम्बई नगरीया तू देख बबुआ
सोने चांदी की डगरिया तू देख बबुआ..
जादू-टोने की बजरिया में
माया की नगरीया में बदले
झटपट बदले मुक़द्दर का लेख बबुआ

या गाण्याप्रमाणेच उत्तर भारतातून आलेल्या योगींना मुंबईकडे केवळ बघावे लागेल. या शहराचे अनुकरण करावे लागेल, पण चुकूनही या शहराकडे त्यांनी वक्रदृष्टी टाकली तर काही वर्षांपूर्वी राज ठाकरेंनी जे खळ्ळखट्ट्याकचे धोरण अवलंबले होते त्याची पुनरावृत्ती सर्वसामान्यांकडून होण्यास वेळ लागणार नाही. त्यामुळे योगींनी इतकेच लक्षात ठेवावे की, इ है मुंबई नगरिया तू देख ले बबुआ!

इ है बम्बई नगरिया तू देख बबुआ!
Hemant Bhosalehttps://www.mymahanagar.com/author/bhemant/
गेली २० वर्षांपासून पत्रकारितेत. अंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय राजकीय घडामोडींवर सातत्याने लेखन. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -