घरफिचर्सरंगवेड्या सृष्टीचा वसंतोत्सव

रंगवेड्या सृष्टीचा वसंतोत्सव

Subscribe

लालजर्द फुलांनी अंगोपांग बहरलेला पळस, सोनपिवळ्या रंगांत न्हाऊन निघालेला बहावा.. जांभळ्या छटांची पखरण करणारा नीलमोहर, फांद्याफांद्यावर झुपकेदार गजरे माळलेला गिरिपुष्प... वसंत ऋतुच्या स्वागतासाठी निसर्गात सुरू असलेली रंगांची ही उधळण खरंतर डोळ्यांचं पारणं फेडणारी. म्हणूनच धुळवडीत हरवलेल्या रानवाटा, ओसाड टेकड्या आणि शिशिरात अंग झटकून आता फुलं माळलेल्या वनराईचा हा पुष्पोत्सव आवर्जून अनुभवावा असाच असतो.

शहरातल्या त्याच त्या वाटा, त्यावरची दैनंदिन गरजा भागवणारी ठिकाणं, तळहातावर अधिराज्य गाजवणारा मोबाईल किंवा फारतर तोंडासमोरचा मॉनिटर एवढ्याच ‘डिजिटल जगात’ हरवलेल्यांना सृष्टीची अगाध क्षमता आणि तिची माया चटकन लक्षात येणार नाहीच. मात्र, परिचित वाटा सोडून जरा बाजूला गेलं की निसर्ग हळूच खुणावू लागतो आणि प्रचिती येते ती नवचैतन्याची. वसंत ऋतुच्या स्वागतासाठी निसर्गाने केलेली ही पुष्पोत्सवाची रचना अभूतपूर्व अशीच म्हणावी लागेल. कारण, डिजिटल कलर पॅलेट फिका पडावा एवढ्या छटा लेवून निसर्गातली शेकडो प्रकारची झाडं अक्षरशः रंगवैभवाने नटून उभी आहेत.

प्रत्येक झाडाची उंची, पानांची रचना, त्याचे गुुण वेगवेगळे असले तरीही वसंत ऋतुच्या आगमनापूर्वी अर्थात शिशिरात अंगावरची सारी पालवी झटकून देत फुलांचा संभार करताना मात्र त्यांनी कुठेही दुजाभाव केलेला दिसत नाही. वर्षाऋतूत निसर्गाने जे काही दिलं त्या कोवळ्या पालवीचं दान शिशिरात सृष्टीच्या पदरात टाकून, त्या दानाचं ऋण व्यक्त करणार्‍या वृक्षवल्लीचा हा स्थायीभाव खूपकाही शिकवून जातो.

- Advertisement -

वसंत ऋतुमुळे कितीतरी झाडांचं अस्तित्त्व रंग आणि गंधाच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचतंय. अर्थात आपले ऋतू आणि त्यांच्या हातात हात घालून येणार्‍या सणांची रचना बघितली की रचनाकारांच्या क्षमतेचा चटकन अंदाज येतो. रंगपंचमीपूर्वीच रंगांची उधळण करणारा वसंत ऋतु होळी, गुढीपाडवा, चैत्रोत्सव अशा सणांची श्रुंखलाच घेऊन येतो आणि त्यासाठी अवघी वनराई नटून उभी असते. रक्तवर्णी फुलांनी पळस फुलला की या ऋतुची चाहूल लागते. त्याच्या जोडीला स्पॅतोडिया, काटेसावर आणि पांगारा असतोच. दुपारच्या ऊन्हातली स्पॅतोडियाची फुलं तर ज्वालांसारखी भासतात आणि पांगारा शांत निळ्या अस्मानी लालभडक फुलांची आेंजळ घेऊन उभा असतो. खोडापासून ते फांदीपर्यंत अंगभर काटे असलेला काटेसावर पक्षांचा आवडता वृक्ष.

कारण, काहीशी मखमली, जाडसर फुलं त्यांना भरपूर गोडवा देतात. पांगारा, काटेसावर या झाडांवर बुलबुल, वटवट्या, कोतवाल, रॉबिन असे कितीतरी पक्षी हमखास दिसतात. शांत स्वभावाचा सीता-अशोकदेखील याच काळात फुलतो. पोपटाच्या चोचीसारखी पळसाची फुलं दूरूनही चटकन चटकन लक्ष वेधून घेतात. औषधी गुणधर्म असल्याने आयुर्वेदातही या वृक्षाला मोठं महत्त्व आहे. शहरी वाटांवर, उद्यानांत दिसणारी बॉटल ब्रशची झाडंही आता रक्तवर्णी फुलांनी बहरली आहेत. नावाप्रमाणेच पानांपानांतून डोकावणारी याची फुलंही आकर्षक दिसतात. होळीनंतर वाढणार्‍या उन्हाच्या तीव्रतेची जाणीव ही झाडं करून देत असतात.

- Advertisement -

हलक्या गुलाबी छटांचा गिरीपुष्प, शिरिष आणि कॅशिया तर कवेत एकाचवेळी भरभरुन फुलं घेऊन यावीत, अशी उभी असतात. गिरीपुुष्पाची फुलं फुलली की त्याच्या जवळपास राहणार्‍या सापांसह अन्य सर्वच सरपटणारे प्राणी तेथून पळ काढतात. कारण, या फुलांचा वास त्यांना सहन होत नाही असं म्हणतात. कदाचित म्हणूनच हे झाड आदिवासी भागात उंदीरमारी नावाने ओळखलं जातं. प्रत्येक झाडाच्या अशा काहीना काही गंमतीजमती असतात. त्या-त्या झाडाच्या सानिध्यात गेल्या की लक्षात येतात. कॅशिया आपल्याकडे तसा दुर्मीळ, पण आजही काही ठिकाणी अस्तित्त्व टिकवून आहे. तर, शिरिष काहीसा उंच वृक्ष आणि तुलनेने फुलं खूप लहान आणि नाजूकही असतात. मात्र, तरीही दूरवरुन हा वृक्ष संपूर्ण गुलाबी झालेला दिसतो.

उन्हाच्या चटक्याचं रंगवर्णन करणार्‍या या झाडांसोबतच नीलमोहर मनाला आणि डोळ्यांनाही सुखावून जातो. गुलमोहराच्या जवळ जाणारं हे झाड या दिवसांत जांभळ्या छटा असलेल्या फुलांनी डवरलेलं असते. हे झाड जिथेकुठे रस्त्याकडेला असेल तिथे आपल्यासभोवती हलक्या जांभळ्या पाकळ्यांची पखरण करतं. या काळात पानं कमी आणी फुलंच अधिक दिसतात. नीलमोहरचा रंगसोबती असतो तो महाराष्ट्राचं राज्यफुल असलेला ताह्मण. जराशी गडद जांभळ्या रंगाची याची फुलं मधमाशा, सूर्यपक्षी यांची आवडती. याच्या पाकळ्यांची रचना गुलमोहराच्या फुलांसारखी असली तरीही आतील पुंकेसर व कळ्या या वेगळ्या असतात.

हळदीच्या रंगात न्हाऊन निघालेला टॅबुबिया, पिवळा बहावा आणि शिवण अर्थात गंभारीची फुलं म्हणजे आपल्याला सुुखावून जातात. मध्यम उंचीचा ट्यॅबुबिया पिवळ्याधमक फुलांचे घोस घेऊन उभा असतो. बहाव्याचं वर्णन करावं तेवढं कमीच ठरेल. एखाद्या तरुणीने केसांत गजरा माळावा अशा रितीने फुलांचे अधांतरी लोंबणारे घोस बहाव्याचं हटकेपण सिद्ध करतात.

फेब्रुवारीत पांढरी सावर, मोह, पळस, कडुनिंब, ट्यॅबुुबिया, मार्चमध्ये पांगारा, शिरिष, नागचाफा, नीलमोहोर, सफेद खैर, एप्रिल महिन्यात आपटा (चित्रक) बेल, तर मे महिन्यात ताह्मण, बहावा, कदंब, गुलमोहर, सीता-अशोक निसर्गाचं सौंदर्य खुलवत असतो. त्यामुळे निसर्गाच्या आणि त्यातही फुलांच्या विश्वात गेलं की निसर्गाची किमया सहज लक्षात येते. म्हणूनच

वास नाही ज्या फुलांना फक्त ती पाहून घे!
धुंद आहे गंध ज्यांना तो तिथे जाऊ दे!
या कवी बोरकरांच्या ओळींचं स्मरण होतं!

Prashant Suryawanshi
Prashant Suryawanshihttps://www.mymahanagar.com/author/sprashant/
गेल्या १६ वर्षांपासून नाशिकमध्ये प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. तंत्रज्ञानातील बदल, पर्यावरण, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर विपुल लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -