महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावरून संघर्ष निर्माण झाला आहे. सोलापूर आणि सांगलीतील काही गावांवर कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी दावा सांगितला आहे. त्यावरुन आता महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद प्रश्न पुन्हा एकदा उफाळला आहे. यावेळी कर्नाटकमध्ये गाड्यांची तोडफोड देखील करण्यात आली. त्यामुळे महाराष्ट्रातील नेते चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहेत. दरम्यान, आपल्या महाराष्ट्राची गावं दुसऱ्या राज्यात पळवण्याचा प्रयत्न सुरु आहे. पण, घटनाबाह्य मुख्यमंत्री मात्र ह्या सगळ्यावर गप्प का?, असा सवाल ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी उपस्थित करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर हल्लाबोल केला आहे.
कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई यांच्या दमदाटीला घाबरून महाराष्ट्रातील घटनाबाह्य सरकारचे मंत्री तंतरले आणि दौरा स्थगीत करून बसले. ही अखंड महाराष्ट्रासाठी शरमेची, दुःखाची गोष्ट आहे.
— Aaditya Thackeray (@AUThackeray) December 6, 2022
आदित्य ठाकरे यांनी ट्विट करत मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे. एका बाजूला शेतकरी त्रस्त आहेत. महिलांवर अत्याचार वाढत आहेत. उद्योग महाराष्ट्रातून एका राज्यात पाठवलेत. आता आपल्या महाराष्ट्राची गावं दुसऱ्या राज्यात पळवण्याचा प्रयत्न सुरु आहे. पण, घटनाबाह्य मुख्यमंत्री मात्र ह्या सगळ्यावर गप्प का? कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई यांच्या दमदाटीला घाबरून महाराष्ट्रातील घटनाबाह्य सरकारचे मंत्री तंतरले आणि दौरा स्थगित करून बसले. ही अखंड महाराष्ट्रासाठी शरमेची, दुःखाची गोष्ट आहे, असं आदित्य ठाकरे म्हणाले.
महाराष्ट्रधर्माशी केलेली गद्दारी आहे! स्वतःसाठी दुसऱ्या राज्यात पळून गेले, पण महाराष्ट्रासाठी बेळगावला जात नाहीत?, राग ह्या गोष्टीचा येतो की, खरंतर जो विषय चर्चेचा नाही त्यावर चर्चा करायला निघाले होते, पण कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी दम देताच आपले मंत्री घाबरून तिथे गेलेच नाहीत. एवढं हतबल सरकार महाराष्ट्रात कधीच नव्हतं, असंही आदित्य ठाकरे म्हणाले.
कर्नाटकात महाराष्ट्रातील ट्रकवर दगडफेक करण्यात आली आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेत कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना २४ तासांचा अल्टिमेटम दिला आहे. जर पुढच्या २४ तासांच्या आत परिस्थिती निवळली नाही तर कर्नाटकचे मुख्यमंत्री आणि सरकार या सर्व परिस्थितीला जबाबदार राहतील, असं शरद पवार म्हणाले. त्यांच्यानंतर संजय राऊत, छगन भुजबळ, जितेंद्र आव्हाडही या सर्व घटनेनंतर आक्रमक झाले असून त्यांनीही कर्नाटक सरकारला जाब विचारत इशारा दिला आहे.
हेही वाचा : शरद पवारांवर 48 तासात बेळगावला जाण्याची वेळ येणार नाही; फडणवीसांचे आश्वासन