घरमहाराष्ट्रपर्यावरणदिनी राजकीय प्रदूषण नको - आदित्य ठाकरे

पर्यावरणदिनी राजकीय प्रदूषण नको – आदित्य ठाकरे

Subscribe

भाजप अध्यक्ष अमित शहा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मातोश्री निवासस्थानी भेट घेणार असल्याचे वृत्त झळकल्यापासून राजकीय क्षेत्रात यावर बरीच चर्चा होत आहे. दरम्यान याविषयासंदर्भात शिवसेनेचे युवानेते आदित्य ठाकरे यांना पत्रकारांनी हटकले असता त्यांनी प्रतिक्रिया देण्याचे टाळले. “आज जागतिक पर्यावरण दिन असून आजच्या दिवशी राजकीय प्रदूषण आणू इच्छित नाही”, असे वक्तव्य त्यांनी केले.

तसेच आरोग्यमंत्री दीपक सावंत यांच्या राजीनाम्याविषयी ते म्हणाले की, “सावंत यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला असून ते आता पक्षसंघटनेसाठी झोकून काम करतील”. आज झालेल्या कॅबिनेट बैठकीत डॉ. दीपक सावंत यांनी हजेरी लावली होती. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी जरी अद्याप राजीनामा स्वीकारला नसला तरी शिवसेनेने मात्र राजीनामा स्वीकारला आहे, हे आदित्य ठाकरे यांच्या वक्तव्यावरुन कळते.

- Advertisement -

आज जागतिक पर्यावरणदिनानिमित्य पर्यावरण संवर्धनाचा संदेश तसेच प्लास्टिक बाटल्याचे विघटन करण्यासाठी शासनातर्फे एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला आदित्य ठाकरे, उद्योग मंत्री सुभाष देसाई आणि पर्यावरण मंत्री रामदास कदम उपस्थित होते. “ग्लोबल वॉर्मिंग आणि वातावरणातील बदल ही जगासमोरची मोठी समस्या असून पर्यावरण टिकले तरच आपण टिकू आणि भविष्यात राजकारणासाठी जगू”, असेही आदित्य ठाकरे यांनी सांगितले.

एक टक्का रक्कम प्लास्टिक वेचणाऱ्यांसाठी

उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी म्हटले की, प्लास्टिक निर्माण करणाऱ्या कंपन्यांना आपल्या उत्पादनातील एक टक्का रक्कम विघटन, प्लास्टिक वेचणाऱ्यांसाठी खर्च करावा. जेणेकरून जी लोकं मोठ्या प्रमाणात प्लास्टिक गोळा करतात, त्यांना फायदा होऊन प्रदूषण कमी होण्यास मदत होईल.

- Advertisement -

रामदास कदमांना वाढत्या प्रदूषणाची चिंता

पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी प्रदूषणाबाबत चिंता व्यक्त केली. राज्य सरकारने पर्यावरण संवर्धानासाठी राज्यात प्लास्टिक बंदी केली असली तरी त्याची प्रत्यक्षात अमंलबजावणी होत नाही. राज्यात दररोज बाराशे टन प्लास्टिक तयार होते. परंतु त्याचे विघटन होण्याचे प्रमाण कमी आहे. प्लास्टिकचे विघटन करणाऱ्या कारखान्यांची संख्या वाढवण्याची गरज देखील त्यांनी यावेळी व्यक्त केली.

महाराष्ट्रात प्लास्टिक बंदी असताना गुजरातमधून राज्यात प्लास्टिक दाखल होत असल्याबद्दलच्या घटनेने त्यांनी चिंता व्यक्त केली. ज्या व्यापाऱ्यांच्या बाटल्या पकडल्या त्याच व्यापाऱ्यांनी प्लास्टिकबंदीविरोधात कोर्टात धाव घेतल्याची धक्कादायक माहिती कदम यांनी यावेळी दिली. प्लास्टिकचे प्रदूषण पर्यावरणासाठी हानीकारक असून त्यांचा पुनर्वापर करण्यावर उत्पादक कंपन्यांनी भर द्यावा. सध्या राज्यात १२० कंपन्या पाणी विकतात. अनेकांचे पाणी प्रदूषित असते. दर्जेदार कंपन्यांच्या नावाखाली बोगस कंपन्या कार्यरत असून त्यांच्यावर कारवाई करावी लागेल असेही त्यांनी यावेळी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -