शिवसेना खासदार संजय राऊत यांना पत्राचाळ प्रकरणी ईडीने ताब्यात घेतले आहे. संजय राऊत यांच्या घरी रविवारी सकाळी ७ वाजताच्या सुमारास ईडीचे अधिकारी दाखल झाले होते. त्यानंतर त्यांची चौकशी करण्यात आली. तब्बल साडेनऊ तासांच्या चौकशीनंतर संजय राऊतांना ईडीने ताब्यात घेतले आहे. तसेच, संध्याकाळी ७ वाजेपर्यंत राऊतांना अटक होऊ शकते, अशी माहिती सूत्रांनी दिली. (After nine and a half hours of interrogation, Sanjay Raut is in the custody of ED)
संजय राऊत यांना दक्षिण मुंबईतील ईडीच्या कार्यालयात नेण्यात येणार आहे. त्यापूर्वी ईडीने ताब्यात घेतल्याचे बातमी समोर येताच संजय राऊतांच्या भांडूपमधील घराबाहेर पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. तसेच, मुंबईत ठिक-ठिकाणी संजय राऊतांच्या समर्थनार्थ आंदोलन केले जात आहे. त्यामुळे त्या ठिकाणीही पोलिसांचा फौजपाटा वाढवण्यात आला आहे.
Mumbai: Police personnel deployed outside the residence of Shiv Sena leader Sanjay Raut. He has been detained by the ED after raids were conducted at his residence in connection with Patra Chawl land scam case pic.twitter.com/8iG2a49V6l
— ANI (@ANI) July 31, 2022
ईडीने काही दिवसांपूर्वी राऊत यांना चौकशीसाठी नोटीस बजावली होती. मात्र, संसदेचे अधिवेशन असल्याचे सांगून राऊत ईडीच्या चौकशीला सामोरे गेले नव्हते. तसेच त्यांनी ईडीकडून चौकशीसाठी मुदतवाढ देण्याची विनंती त्यानी केली होती.
२० जुलै रोजी, ईडीने संजय राऊत यांना मुंबईच्या उपनगरातील चाळ प्रकल्पाच्या पुनर्विकासाशी संबंधित कथित मनी लाँड्रिंग प्रकरणाच्या संदर्भात चौकशीसाठी बोलावले होते. संसदेच्या अधिवेशनाचे कारण देत त्यांनी पुढची तारिख मागितली होती.
याप्रकरणी भाजपा नेते किरीट सोमय्या यांनीही संजय राऊतांवर निशाणा साधला आहे. “संजय राऊत आणि तत्कालीन सरकारने माफिया पद्धतीने महाराष्ट्राला लुटण्याचे काम केले. राऊत हे प्रत्येक व्यक्तीला तुरुंगात टाकणार असल्याचे सांगत होते. धमक्या देत होते. काही लोकांना आतही टाकले आहे. पत्राचाळमध्ये 1200 कोटींचा घोटाळा झाला. त्यासोबत नायगाव वसई प्रकरण बाहेर यायचे आहे. मलिकांच्या शेजारी राऊतांची जागा व्हायला हवी असे महाराष्ट्राच्या साडेबारा कोटी जनतेची इच्छा आहे. हे राऊत धमक्या देत होते. पळापळ करत होते. हिशोब देत नव्हते. आता त्यांना हिशोब द्यावा लागणार आहे”, असे किरीट सोमय्या यांनी म्हटले.
हेही वाचा – ईडीच्या भीतीने कोणी आमच्याकडे येऊ नये- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे