नवी दिल्ली – महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्नी वाद विकोपाला जात आहे. सोलापुरातील गावांवर दावा ठोकल्यानंतर कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रावर आगपाखड करायला सुरुवात केली. तसंच, महाराष्ट्राला एक इंचही जागा देणार नाही, असा इशाराही दिला आहे. या दोन्ही राज्यातील सीमावाद संपुष्टात यावा या करता खासदार अमोल कोल्हे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा यांची भेट घेतली. या भेटीनंतर त्यांनी माध्यमांशी साधलेल्या संवादात कर्नाटकातील सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे.
“कर्नाटक सरकारकडून अडेलटट्टू आणि हडेलहट्टीपणाचे धोरण राबवलं जात आहे. सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी प्रलंबित असताना कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांकडून सातत्याने विधान केली जातात. महाराष्ट्रातील गाड्यांवर हल्ले करण्यात येत असून, मंत्र्यांना कर्नाटकात येण्यापासून रोखलं जात आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला संविधान दिलं आहे. त्यामुळे देशात कुठे फिरण्याची मुभा दिली आहे. यालाच कुठेतरी आडकाठी करण्याचं काम केलं जात आहे,” अशी टीका अमोल कोल्हे यांनी कर्नाटक सरकारवर केली.
“अमित शाहांनी महाविकास आघाडीच्या सर्व खासदारांची बाजू संवेदनशीलपणे ऐकून घेतली आहे. परस्पर समन्वयाने तोडगा काढू, असं आश्वासन शाहांनी दिलं. मुख्यमंत्री शिंदे आणि मुख्यमंत्री बोम्मई यांच्याशी गृहमंत्री १४ डिसेंबरला चर्चा करणार असल्याचं कळलं. त्यामुळे समन्वयातून मार्ग निघेल. बेळगाव, निपाणी, बिदर, भालकी येथील मराठी भाषिकांवर सातत्याने अत्याचार होत आहे. त्यांच्यावर कानडी वरवंटा फिरवला जातोय, यावर कुठेतरी चाप बसून दिलासा मिळेल, अशी अपेक्षा आहे,” असं अमोल कोल्हेंनी सांगितलं.