राज्यातील मागील ३ वर्षामध्ये रिक्त झालेल्या एकूण पदापैकी अंगणवाडी सेविका व मदतनीसांची 5 हजार 500 पदे तत्काळ भरण्यास मान्यता देण्यात आली आहे, अशी माहिती महिला व बाल विकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी दिली. या संदर्भात शासन निर्णय निर्गमित करण्यात येत असून लगेचच भरती प्रक्रिया प्रकल्प स्तरावर सुरु करण्यात येत आहे. मंत्रीपदाचा कार्यभार स्विकारल्यानंतर महिला व बालविकास विभागाच्या योजनांचा व कामकाजाचा आढावा घेण्यात आला. या आढाव्याअंती महिला व बाल विकास विभागाच्या बऱ्याच दिवसांपासून प्रलंबित असलेल्या अंगणवाडी सेविका, मदतनीस, मिनी अंगणवाडी सेविका यांच्या रिक्त जागा भरणेबाबत चर्चा करून तत्काळ निर्णय घेण्यात आलेले आहे.
मंत्री ॲड. यशोमती ठाकूर म्हणाल्या, एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत मागील तीन वर्षापासून अंगणवाडी सेविका, मदतनीस, मिनी अंगणवाडी सेविका यांच्या पदभरतीवर निर्बंध लावण्यात आलेले होते. हे निर्बंध हटवून आता मागील तीन वर्षात रिक्त झालेल्या जागा भरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अनेक ठिकाणी या जागा रिक्त असल्याने कुपोषणमुक्तीच्या कार्यक्रमात अडचणी येत आहेत. आता या रिक्त जागा तातडीने भरण्यात येऊन कुपोषणमुक्तीचा कार्यक्रम गतीने राबविण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
राज्यात ९८ अंगणवाडी आणि ७४५ मिनी अंगणवाडी सुरु करणार
राज्यात एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत केंद्र शासनाने पूर्वीच मान्यता दिलेल्या परंतु कार्यान्वित न झालेल्या ९८ अंगणवाडी व ७४५ मिनी अंगणवाडी केंद्रे सुरु करण्यास मान्यता देण्यात आल्याची माहिती महिला आणि बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी दिली.
मंत्रिपदाचा कार्यभार स्विकारल्यानंतर मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी महिला व बालविकास विभागाच्या योजनांचा व कामकाजाचा आढावा घेतला. या आढाव्यामध्ये केंद्र शासनाने पूर्वीच मान्यता देऊनही ही अंगणवाडी केंद्रे अद्याप सुरु करण्यात आली नसल्याचे निदर्शनास आले. तेव्हा ही केंद्रे सुरु करण्याबाबत तातडीने कार्यवाही करण्यात यावी, अशा सूचना मंत्री श्रीमती ठाकूर यांनी विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या. त्यानुसार राज्याच्या विविध भागात या नव्या अंगणवाड्या लवकरच सुरु करण्याची कार्यवाही करण्यात येत आहे.