शिवसेनेचे नेते अर्जुन खोतकर आणि काँग्रेसचे आमदार अब्दुल सत्तार यांच्यामध्ये आज बैठक झाली. औरंगाबाद शहरातील बीड बायपास परिसरात दोघांमध्ये गुप्त चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे. दोघांची तासभर झाली चर्चा. जालना लोकसभेच्या अनुषंगाने ही भेट झाल्याची माहिती आहे. अर्जुन खोतकर हे काँग्रेसमध्ये जाणार असल्याची चर्चा रंगली आहे. यामुळे लोकसभा निवडणुकीत भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या अडचणीत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, या भेटीनंतर दोन दिवसात अर्जुन खोतकर यांच्याबद्दल गुडन्यूज मिळेल असं म्हणत अब्दुल सत्तार यांनी गौप्यस्फोट केला आहे. तसंच आम्ही दोघे चांगले मित्र आहोत. दोघेही राजकीय क्षेत्रात एक आहोत तसंच आम्ही सुखदु:खात एकमेकांना मदत करतो. त्यामुळे आजची भेट आणि चर्चा काहीही असू द्या मात्र लोकसभेच्या निकालानंतर नक्की आनंद होईल. जर आनंदाची बातमी नसती तर आम्ही भेटलोच नसतो असा गोप्यस्फोट सत्तार यांनी केला आहे. त्यामुळे अर्जुन खोतकर काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याच्या चर्चेला औरंगाबादमध्ये उधाण आले आहे.