घरमहाराष्ट्रअर्णब गोस्वामींना आणखी दोन दिवस कोठडीत काढावे लागणार

अर्णब गोस्वामींना आणखी दोन दिवस कोठडीत काढावे लागणार

Subscribe

9 नोव्हेंबरला होणार सुनावणी, रायगड पोलिसांनी सत्र न्यायालयात दाखल केला पुनर्निरीक्षण अर्ज

अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात अर्णव गोस्वामी यांना आणखी दोन दिवस कोठडीत काढावे लागणार आहेत. याप्रकरणी आता 9 नोव्हेंबरला सुनावणी होणार आहे. गोस्वामी याच्या न्यायालयीन कोठडीच्या आदेशाला आव्हान देत, रायगड पोलिसांनी सत्र न्यायालयात पुनर्निरीक्षण अर्ज दाखल केला आहे. आज (7 नोव्हेंबर) अलिबाग येथील सत्र न्यायालयात सुनावणीचे काम सुरु आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश आर.जी. मलशेट्टी यांच्यासमोर ही सुनावणी सुरु आहे.

सकाळी सव्वाअकरा वाजण्याच्या सुमारास सुनावणीला सुरुवात झाली. या प्रकरणातील तिसरा आरोपी नितेश सारडा याच्या वकीलांनी सरकारपक्षातर्फे दिलेला पुनर्निरीक्षण अर्ज आणि स्थगिती अर्ज तसेच रिमांडबाबत करण्यात आलेला आदेश मराठीत असल्याने, तो इंग्रजीमध्ये भाषांतरीत करुन मिळण्याची मागणी न्यायालयात केली. सारडा हे राजस्थानचे राहणारे आहे. या अर्जावर सरकार पक्षातर्फे विशेष सरकारी वकील प्रदीप घरत यांनी युक्तिवाद केला. या न्यायालयाची भाषा मराठी आहे. आरोपीचे वकील हे देखील महाराष्ट्रातील असून त्यांची भाषाही मराठी आहे. तसेच रिमांडकामी पोलिसांनी दिलेले रिपोर्ट मराठीत असतात. तसेच रिमांडचे कामी नितेश सारडाच्या वकीलांनी रिमांड रिपोर्ट मराठीत असूनही युक्तिवाद मराठीतच केला. तेव्हा त्यांनी आक्षेप घेतला नाही. यामुळे केवळ पुनर्निरीक्षण अर्ज आणि स्थगिती अर्ज इंग्रजीमध्ये भाषांतरित करुन मिळण्याची सारडा याच्या वकीलांची मागणी फेटाळण्याची विनंती अ‍ॅड.घरत यांनी केली. युक्तिवाद ऐकल्यानंतर अतिरिक्त सत्र न्यायाधीश यांनी नितेश सारडा यांच्या वकीलांचा अर्ज फेटाळून लावला.

- Advertisement -

त्यानंतर न्यायालयीन कोठडीत असलेल्या अर्णव गोस्वामी, फिरोज शेख आणि नितेश सारडा यांच्या वकीलांनी पुनर्निरीक्षण अर्ज आणि स्थगिती अर्जावरील आजची सुनावणी स्थगित करुन सुनावणीकरिता पुढील मुदत मागितली. मात्र याला विशेष सरकारी वकील प्रदीप घरत यांनी जोरदार हरकत घेतली. उच्च न्यायालयात दाखल याचिकेतील मुद्दे आणि सत्र न्यायालयात ज्या कारणासाठी अर्ज दाखल केला आहे ते मुद्दे वेगळे आहेत. केवळ आरोपींना पोलीस कोठडी होऊ नये, याकरिता आरोपींचे वकील वेळ काढत असल्याचे त्यांनी युक्तिवादात म्हटले. दोन्ही बाजू ऐकल्यानंतर सत्र न्यायालयाने या प्रकरणाच्या सुनावणीकरिता सोमवार 9 नोव्हेंबर ही तारीख दिली. विशेष सरकारी वकील अ‍ॅड. प्रदीप घरत यांनी सरकार पक्षातर्फे युक्तिवाद सुरु केला. आता अर्णव गोस्वामी, फिरोज शेख व नितेश सारडा यांच्या वतीने त्यांचे वकील 9 नोव्हेंबरला युक्तिवाद करतील.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -