क्रूझ ड्रग्ज प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आर्यन खान ड्रग्ज प्रकरणातून एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांना हटवण्यात आलं आहे. आता या प्रकरणाची चौकशी दिल्ली एनसीबीची टीम तपास करणार आहे. आर्यन खान प्रकरणासह सहा प्रकरणं वानखेडे यांच्याकडून काढून घेण्यात आल्या आहेत. यासंदर्भातील माहिती एनसीबीचे उपमहासंचालक मुथा अशोक जैन यांनी दिली.
क्रूझ ड्रग्ज प्रकरणानंतर समीर वानखेडेंवर सातत्याने आरोप होत होते. राज्याचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी तर समीर वानखेडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. समीर वानखेडे यांनी स्वतःची टीम तयार करून खोट्या केसेस तयार शेकडो कोटींची खंडणी जमा केली, असा आरोप मलिक यांनी केला. तसंच वानखेडेंच्या जातीच्या प्रमाणपत्रावरही त्यांनी संशय व्यक्त केला होता. त्यामुळे वानखेडे वादात सापडले आहेत. त्यानंतर क्रुझ ड्रग्ज प्रकरणातील पंचानीही गौप्यस्फोट केले. तर काही पंचाना अटकही करण्यात आली होती. मुंबई एनसीबीकडून शाहरुख खानकडून २५ कोटींची मागणी केल्याचंही समोर आलं होतं. या सगळ्या आरोपांची चौकशी सुरू आहे. दरम्यान, या प्रकरणातून समीर वानखेडे यांना हटवण्यात आलं आहे.
आर्यन खान प्रकरणाची चौकशी आता संजय सिंग यांच्याकडे देण्यात आली आहे. उद्यापासूनच संजय सिंग या प्रकरणाची तपास करणार असल्याचं बोललं जातंय.