‘धनंजय मुंडे म्हणजे आमचे सिंघम आहेत. त्यांचे अभिनंदन करणे गरजेचे’, असे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण अशोक चव्हाण म्हणाले. शनिवारी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या निर्धार परिवर्तनाच्या जाहीर सभेत ते बोलत होते. ही सभा बीड जिल्हातील परळी तालुक्यात आयोजित करण्यात आली होती. यावेळी अशोक चव्हाण यांनी भाजप सरकारवर टीका केली आहे. त्याचबरोबर लोकांचा आवाज आता बुलंद करायचा आहे, असं देखील ते म्हणाले आहेत. यापुढे चव्हाण म्हणाले की, ‘२०१४ साली भाजपला फक्त ३०% मतदान मिळालं आणि ७०% मतांचे विभाजन झाले. त्यामुळे भाजप ३०% वर जिंकले. आपल्याला ही परिस्थिती बदलायची आहे म्हणून ही महाआघाडी आहे.’
‘मुख्यमंत्री महोदय तुम्ही नापास झालात’
अशोक चव्हाण म्हणाले की, ‘महाराष्ट्रात आज भीषण परिस्थिती आहे. लोकांच्या मनात नैराश्य आहे. पण तरी मुख्यमंत्री म्हणतात अभ्यास करतो. मुख्यमंत्री महोदय तुम्ही नापास झालात. मुख्यमंत्र्यांनी कर्जमाफीची घोषणा केली. मात्र अजून लोकांना पैसा मिळाला नाही, सरकारच्या खिशात दमडी नाही, हे सरकार भिकारी झालेलं सरकार आहे. तेव्हा यांच्याकडून कर्जमाफीची अपेक्षा सोडून द्या.’ त्याचबरोबर आघाडी सरकार असताना एकनाथ खडसे म्हणायचे की इतक्या आत्महत्या वाढत आहेत. या सरकारवर ३०२ चा गुन्हा का दाखल करू नये? आता आत्महत्या प्रचंड वाढल्या आहेत. मग मुख्यमंत्री महोदय कुणावर ३०२ चा गुन्हा दाखल करावा? असा प्रश्न त्यांनी विचारला आहे.