संरक्षण दलाचे प्रमुख बिपीन रावत यांच्या अपघाती निधनामुळे देशावर शोककळा पसरली आहे. रावत यांच्या निधनामुळे देशातील नागरिकांच्या मनात घातपाताचा संशय निर्माण झाला आहे. तशीच शंका देशाच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मनात निर्माण झाली असेल. केंद्र सरकारही गोंधळलेल्या अवस्थेमध्ये असल्याचे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे. संजय राऊत यांनी रावत यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे. तसेच देशाच्या सेनापतीच्या निधनावर ज्या शंका उपस्थित झाल्या आहेत. त्याचे निरसन केंद्र सरकारने केलं पाहिजे असेही संजय राऊत म्हणाले आहेत.
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. यावेळी राऊत म्हणाले की, जनरल बिपीन रावत यांच्या अशा अचानक अपघाती निधनाने देश नाहीतर सरकारसुद्धा गोंधळलेले आहे. आम्ही सगळेच संसदेच्या बाहेर गांधी पुतळ्याजवळ असताना जी माहिती आली तेव्हा त्या ठिकाणी हाहाकार माजला होता. कारण बिपीन रावत यांच्या अंगावर लष्करी गणवेश असला तरी अनेक कार्यक्रमात त्यांच्याशी संवाद होत होता. तेव्हा ते लष्करी रुबाब बाजूला ठेवून संवाद साधायचे त्यामुळे प्रत्येकाला तो माणूस आपला वाटायचा असे संजय राऊत म्हणाले आहेत.
पंतप्रधानांच्या मनातही शंका
सीडीएस बिपीन रावत यांच्या अपघाती मृत्यूमुळे देशाचे सर्वोच्च नेतृत्वसुद्धा गोंधळलेले असेल. या घटनेमुळे त्यांच्या मनात देखील काही शंका नक्कीच निर्माण झाल्या असतील असे संजय राऊत म्हणाले.
राऊतांनी सांगितल्या बिपीन रावत यांच्यासोबतच्या आठवणी
अनेक वर्ष त्यांच्यासोबत काम केले आहे. आमच्या समितीला माहिती देण्यासाठी अनेकदा आले आहेत. त्यांच्याविषयीच्या आठवणी देखील महत्त्वाच्या आहेत. त्यांच्याशी संवाद साधला आहे. सर्वोच्च सेनापती होते परंतु सीमेवरच्या सामान्य जवानाशी त्यांचा संवाद होता. अनेकदा किचकट विषय चांगल्या पद्धतीने समजवून सांगितल्यामुळे समितीच्या मनातील गोंधळ आणि गैरसमज दूर झाला आहे. सर्व शंकांचे अनेकदा सोप्या शब्दात निरसन करण्याचे काम केले आहे हे मी पाहिले असल्याची आठवण संजय राऊत यांनी सांगितली.
अपघातामध्ये घातपाताचा अंदाज
रावत यांच्या हेलीकॉप्टर क्रॅशमध्ये घातपाताचा अंदाज व्यक्त होत असल्याचे संजय राऊत म्हणाले. अनेकदा आपल्या देशात १९५२ मध्ये सुद्धा उंच भागात लष्करी अधिकाऱ्यांना घेऊन जाणारे हेलीकॉप्टर कोसळले होते. त्याच्यामध्ये ५ ते ६ बडे अधिकारी होते. तेव्हा पासून अशा प्रकारचा प्रवास करताना सावधानता बाळगावी असे आदेश होते. तसेच एकापेक्षा जास्त अधिकाऱ्यांनी प्रवास करु नये असे आदेश होते. रावत यांच्यासोबत एक अधिकारी आणि इतर जवान होते परंतु अशाप्रकारे एकाचवेळी १३ जणांचे अपघाती निधन होणे ही देशासाठी मोठी हानी असल्याचे संजय राऊत म्हणाले आहेत. चीनसोबत सुरु असलेल्या वादामुळेही शंका निर्माण होत असल्याचे राऊत म्हणाले.
हेही वाचा : सीडीएस बिपीन रावत आणि त्यांच्या पत्नीची शेवटची इच्छा अपूरी
हेही वाचा : शरद पवारांनी पायलटला दिलेल्या सल्ल्याने हेलिकॉप्टर अपघातातून बचावले होते, सांगितला किस्सा