uमुंबई । विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर जमून भाजपच्या कोअर कमिटीचे नेते उद्धव ठाकरे यांचे फेसबुक लाईव्ह बघत होते. ठाकरेंनी राजीनाम्याची घोषणा करताच भाजप नेत्यांनी एकच जल्लोष केला. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, देवेंद्र फडणवीस, आमदार प्रवीण दरेकर आणि इतर आमदारांनी एकमेकांना पेढे भरवून गळाभेट करत आनंद साजरा केला. सत्तास्थापनेच्या तयारीसाठी पुढील २ ते ३ दिवसांत भाजप बैठक घेऊन आपली रणनीती ठरवणार आहेत. त्यानंतर भाजपकडून राज्यपालांकडे सत्ता स्थापनेचा दावा करण्यात येईल, असे समजते.
नितेश राणेंनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, आमच्या घरावर हल्ले करणं, आमच्यावर खोट्या केसेस टाकणं आणि वेगवेगळ्या पद्धतीचा त्रास देणं, या सर्व गोष्टींचा निकाल आज लागला आहे. शेवटी अडीच वर्षामध्ये महाराष्ट्र कुठे गेला आणि महाराष्ट्राला कुठपर्यंत घेऊन गेले यावर काहीही चर्चा होत नाही, पण महाराष्ट्रामध्ये गेल्या अडीच वर्षामध्ये बदला घेण्याचे जे राजकारण करण्यात आले त्याचा अंत झाला आहे.
एक आमदार म्हणून मला अनेक अपेक्षा आहेत. त्यामुळे त्या अपेक्षा पूर्णही होतील. सिंधुदुर्ग जिल्हा आणि कोकण म्हणून प्रचंड अन्याय केला गेला. सगळ्या बाबतीत पीछेहाट झाली आहे. निधी द्यायचा नाही आणि वेगवेगळ्या लोकांच्या बदल्या करायच्या अशा प्रकाराची यादी फार मोठी आहे, परंतु हे सर्व जुने दिवस आहेत, परंतु आता माझा मतदारसंघ कोकण आणि सिंधुदुर्ग जिल्हा विकासाच्या मार्गाने जाईल आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हक्काने घेऊन जातील, असा माझा विश्वास आहे.
ओबीसींच्या बाबतीत आणि इतर महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले तेही शेवटच्या दिवशी घेतले, असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता नितेश राणे म्हणाले की, खरंतर एकनाथ शिंदे यांचे आभार मानायला पाहिजेत. जर त्यांनी ही भूमिका घेतली नसती तर त्यांना या सर्व गोष्टी करायच्या पण आठवलं नसतं. गेल्या अडीच वर्षामध्ये तुम्हाला औरंगाबाद शहराचं नाव संभाजीनगर करावसं का वाटलं नाही, असा प्रश्नदेखील राणेंनी मुख्यमंत्र्यांना विचारला.