गेल्या दोन दिवसांपासून सर्वोच्च न्यायालयामध्ये महाराष्ट्रातल्या सत्तापेचावर सुरू असलेल्या सुनावणीमध्ये अखेर सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिलेला आहे. या निर्णयानुसार २७ नोव्हेंबर रोजीच बहुमत चाचणी घ्यावी, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. शिवाय, बुधवारी संध्याकाळी ५ वाजेपर्यंत आमदारांचे शपथविधी व्हायला हवेत, असे देखील न्यायालयाने बजावले आहे. या निर्णयावर भाजपाचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी ‘आम्ही बहुमत सिद्ध करून दाखवू’, असा दावा त्यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना केला आहे.
BJP leader Rao Saheb Danve: We will prove our majority. Tonight at 9 pm, all BJP MLAs will meet at Garware Club in Mumbai. #Maharashtra pic.twitter.com/hjKxrkRXDY
— ANI (@ANI) November 26, 2019
काय म्हणाले दानवे?
राज्यातील सत्तापेचावर सुरु असलेल्या सुनावणीमध्ये अखेर सर्वोच्च न्यायालयाने निकाल देत उद्या फडणवीस सरकारला बहुमत सिद्ध करायचे आहे. यापार्श्वभूमीवर आज, भाजपा कोअर कमिटीची बैठक मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर पार पडली. या बैठकीला उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हे देखील उपस्थित होते. या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना भाजपाचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे म्हणाले की, ‘सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या निर्णयाचा आम्ही आदर करतो. विधानसभेत आम्ही बहुमत सिद्ध करून दाखवू. तसेच आज, सायंकाळी गरवारे क्लबला भाजपाच्या सर्व आमदारांना बोलावलेलं आहे,’ अशी माहिती दानवे यांनी दिली आहे.
काय झालं सुनावणीदरम्यान?
शनिवारी २३ नोव्हेंबरला भल्या सकाळीच राज्यपालांनी देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रीपदाची तर अजित पवार यांना उपमुख्यमंत्रीपदाची शपथ दिली होती. मात्र, यावरच शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या महाविकास आघाडीने सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली होती. यावेळी सर्वोच्च न्यायालयाचे दुसऱ्या क्रमांकाचे न्यायमूर्ती रमण्णा यांच्या अध्यक्षतेखालील तीन न्यायमूर्तींच्या घटनापीठासमोर या प्रकरणाची सुनावणी सुरू होती. यामध्ये न्यायमूर्ती अशोक भूषण आणि न्यायमूर्ती संजीव खन्ना यांचा देखील समावेश होता. यामध्ये महाविकास आघाडीकडून तातडीने बहुमत चाचणी घेण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली होती.
हेही वाचा – ‘आम्ही ३० मिनिटात बहुमत सिद्ध करु’