घरताज्या घडामोडीकाँग्रेसचं भ्रष्टाचारी नेत्यांच्या बचावासाठी नौटंकी आंदोलन, भाजपचा राहुल गांधींवर निशाणा

काँग्रेसचं भ्रष्टाचारी नेत्यांच्या बचावासाठी नौटंकी आंदोलन, भाजपचा राहुल गांधींवर निशाणा

Subscribe

महाराष्ट्रातही काँग्रेसच्या मूठभर कार्यकर्त्यांनी राजभवनसह अन्य ठिकाणी निदर्शने केल्याने महाराष्ट्रातही जनतेला वेठीस धरण्याचे प्रयत्न होत आहेत असे केशव उपाध्ये यांनी म्हटलं आहे

काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या ईडी चौकशीविरोधात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या नेत्यांनी राज्यात आंदोलन केले आहे. मुंबईपाठोपाठ राज्यात इतर जिल्ह्यांमध्ये काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. यावर भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी निशाणा साधला आहे. मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण, एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन, शेतकऱ्यांना अपुरी मदत, शेतकऱ्यांची वीज तोडणी यासारख्या ज्वलंत प्रश्नांवर आंदोलन करण्याऐवजी काँग्रेस कार्यकर्ते गांधी परिवाराच्या बचावासाठी मैदानात उतरले आहेत. भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या गांधी परिवारासाठी काँग्रेसचे मुठभर कार्यकर्ते नौटंकी आंदोलन करत जनतेला वेठीस धरत आहेत अशी टीका केशव उपाध्ये यांनी केली आहे. राज्य सरकारने जनतेला वेठीस धरण्याचे प्रयत्न हाणून पाडून जनतेच्या सुरक्षिततेची हमी द्यावी असे केशव उपाध्ये म्हणाले.

भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी माध्यमांशी संवाद साधताना काँग्रेसवर निशाणा साधला आहे. नॅशनल हेराल्ड भ्रष्टाचार प्रकरणी न्यायालयाच्या आदेशानुसार राहुल गांधी यांच्या विरोधातील ईडी चौकशीत अडथळे आणून चौकशीवर दबाव आणण्यासाठी देशाला वेठीस धरून हिंसक आणि बेकायदा आंदोलन करण्याचा काँग्रेसचा कट असल्याचे स्पष्टपणे दिसून येते. महाराष्ट्रातही काँग्रेसच्या मूठभर कार्यकर्त्यांनी राजभवनसह अन्य ठिकाणी निदर्शने केल्याने महाराष्ट्रातही जनतेला वेठीस धरण्याचे प्रयत्न होत आहेत असे केशव उपाध्ये यांनी म्हटलं आहे.

- Advertisement -

असोसिएटेड जर्नल लिमिटेड या कंपनीची दोन हजार कोटींची मालमत्ता कवडीमोल किंमतीत हडपल्याच्या प्रकरणी राहुल गांधींची चौकशी करण्याचे आदेश न्यायालयाने दिल्यानंतर ‘ईडी’कडून सुरू झालेल्या चौकशी विरोधात सत्याग्रहाचा कांगावा करून देशातील कायदा सुव्यवस्था स्थिती धोक्यात आणण्याचे षडयंत्र काँग्रेसकडून रचले जात आहे. त्याचाच भाग म्हणून महाराष्ट्रात काँग्रेसची निदर्शने सुरू आहेत. काही राज्यांत काँग्रेस कार्यकर्त्यांनी पोलिसांनाच लक्ष्य केले, तर काही ठिकाणी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेची कोंडी करून जनतेलाच वेठीस धरण्यात येत असल्याचे केशव उपाध्ये म्हणाले.

पक्षश्रेष्ठींवरील निष्ठा नोंदविण्यासाठी आंदोलनात उतरलेल्या नेत्यांनी आपली विवेकबुद्धी हरवल्याचे सिद्ध केले असून देशात अराजक माजविण्याच्या कटात सहभागी झाल्याने त्यांनी आपली उरलीसुरली विश्वासार्हतादेखील गमावली आहे. भ्रष्टाचाराला पाठीशी घालण्याकरिता सुरू असलेल्या या आंदोलनाच्या निमित्ताने सामान्य जनतेला आणि सुरक्षा यंत्रणांना वेठीस धरून दबाव आणण्याचा प्रयत्न जनताच हाणून पाडेल व काँग्रेसच्या विसर्जनाचा मार्ग मोकळा करून देईल असा टोला उपाध्ये यांनी लगावला आहे.

- Advertisement -

हेही वाचा : श्रेय घेणाऱ्या युवराजांनी पालिकेच्या दप्तर दिरंगाईचं उत्तर द्यावे; विद्यार्थ्यांच्या साहित्य वाटपावरून आशिष शेलार आक्रमक

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -