चंद्रपूर – इंग्लडच्या ताब्यात असलेली शिवरायाची जगदंब तलवार (Jagdamba Sword) पुन्हा देशात आणण्यासाठी राज्य सरकारने हालचाली सुरू केल्या आहेत. मात्र, इतर विषय मागे पडण्याकरता जगदंबा तलवारीचा विषय काढला जात असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. तसंच, तलवार आणताय तशीच उद्योगही आणा असा टोला माजी मंत्री आणि आमदार विजय वडेट्टीवार (Vijay Vadettiwar) यांनी मंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांना लगावला आहे.
हेही वाचा – शिवरायांची जगदंबा तलवार भारतात येणारच, राज्य सरकारच्या हालचाली सुरू
जगदंबा तलवार परत येत असेल तर आम्हालाही आनंद होईल. मात्र महाराष्ट्रातील उद्योग बाहेर गेल्याने हजारो बेरोजगारांचे काम गेलं. महाराष्ट्राचे प्रचंड नुकसान झाले. तलवार आणत असताना तलवारीसोबत उद्योगही आणा. बेरोजगारांच्या हातांना काम मिळणं हे ही तेवढेच महत्त्वाचं आहे, असं विजय वडेट्टीवार म्हणाले.
उद्योग गेलेत, रोजगार बुडालेत, महाराष्ट्राचे प्रचंड नुकसान झाले. तो विषय बाजूला ठेवून केवळ भावनेचे राजकारण करण्यासाठी जगदंबा तलवारीच्या विषय पुढे केला. तुमचे राजकारण महाराष्ट्रातील तरुणांना कळत आहे. तलवारीसोबत उद्योग जर आणलेत तर जनता तुमच्या बोलण्यावर विश्वास ठेवील, असे वडेट्टीवार म्हणाले.