राम मंदिराच्या मुद्यावरून प्रकाश आंबेडकर यांनी शिवसेना – भाजपला लक्ष्य केलं. राम मंदिर बांधून पोट भरणार असेल तर राम मंदिरासाठी आमचा पाठिंबा असल्याची खोचक टिका भारिपचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केली. शिवाय, बेरोजगारी, कुपोषण हे देखील प्रश्न सुटणार आहेत का? असा सवाल देखील यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी केला. पुण्यातील मंगळवार पेठेतील छत्रपती शिवाजी स्टेडीयम येथे बोलत असताना त्यांनी राम मंदिराच्या मुद्यावरून भाजप आणि शिवसेनेवर टीका केली. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर सध्या भाजप आणि शिवसेनेकडून राम मंदिराचा मुद्दा उपस्थित केला जात आहे. त्याचा समाचार भारिपचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी घेतला. दरम्यान, एमआयएम आणि भारिपमध्ये युती झाली आहे.
वाचा – राम मंदिरासाठी आरएसएसची ९ डिसेंबरला मेगा रॅली
राम मंदिर आणि निवडणुका
२०१९च्या लोकसभा निवडणुका तोंडावर आल्या आहेत. त्यामुळे शिवसेना आणि भाजपकडून आता राम मंदिराच्या मुद्द्याला हात घातला जात आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आता अयोध्येला देखील जाणार आहे. त्यामुळे भाजपची कोंडी झाली आहे. तर संघानं देखील राम मंदिरासाठी जमिन अधिग्रहण करा, कायदा करा अशी मागणी केल्यानं भाजप समोरच्या अडचणी वाढल्या आहेत. पण, सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ठ असून जानेवारी २०१९ पर्यंत राम मंदिर प्रश्नावरील सुनावणी सर्वोच्च न्यायालयानं तहकूब केली आहे.