राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी आज(मंगळवार) पत्रकार परिषद घेऊन मुंबईतील ताडदेवमध्ये ५०० खोल्यांचं हॉस्टेल उभारणार असल्याची घोषणा केली आहे. जितेंद्र आव्हाड यांनी मुंबईत टाटा कॅन्सर रुग्णालयात दाखल रुग्णांच्या नातेवाईकांना राहण्याची सोय नसल्यामुळे रस्त्यावर, फूटपाथावर राहावे लागते. या रुग्णांच्या नातेवाईकांना राहण्यासाठी म्हाडाचे १०० फ्लॅट्स देण्याचा निर्णय घेतला त्यावेळी खासदार सुप्रिया सुळे यांनी मुंबईत येणाऱ्या महिलांना वसतीगृहाची सोय करावी अशी मागणी केली होती. अवघ्या काही दिवसांत गृहनिर्माण जितेंद्र आव्हाड यांनी खासदार सुप्रिया सुळे यांची मागणी पुर्ण केली आहे.
राज्यातील अनेक जिल्ह्यांतून महिला मुंबईत कामासाठी येतात त्यांच्या राहण्याची गैरसोय होते. या महिलांसाठी मुंबईत वसतीगृह निर्माण करण्याची घोषणा गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे. ताडदेवमध्ये ५०० खोल्यांचे वसतिगृह उभारण्यात येणार आहे. या वसतिगृहात १ हजार महिलांच्या राहण्याची सोय होणार आहे. या वसतिगृहात महिलांसाठी सर्व सुविधाही देण्यात येणार आहे.
सुप्रिया सुळेंनी काय केली होती मागणी
टाटा कॅन्सर रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांच्या नातेवाईकांसाठी राहण्यासाठी म्हाडाचे १०० फ्लॅट्स देणार असल्याची घोषणा गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केली होती. यानंतर ट्विट करत या निर्णयाचे खासदार सुप्रिया सुळे यांनी स्वागत केले होते. तसेच राज्यातून मुंबईत येणाऱ्या महिलांना वसतिगृह निर्माण करण्याची विनंती खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्विट करुन केली होती. सुप्रिया सुळेंनी केलेली मागणी अवघ्या तीन दिवसात जितेंद्र वआव्हाड यांनी पुर्ण केल्याचे दिसते आहे.
Thank you Dr. Jitendra Awhad (@AwhadSpeaks) for helping with accommodation for patients & their families who come for treatment at Tata Hospital, Mumbai.
Similarly there is a need for hostels for Working Women in Mumbai. Please help on similar lines if possible 🙏🏽
— Supriya Sule (@supriya_sule) April 10, 2021
जितेंद्र आव्हाडांनी काय केली घोषणा
महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून कामासाठी आणि शिक्षणासाठी येणाऱ्या महिलांसाठी ताडदेवमध्ये हॉस्टेल उभारणार आहोत, अशी घोषणा जितेंद्र आव्हाड यांनी केली. येत्या दोन वर्षांमध्ये ते हॉस्टेल सेवेत दाखल होईल, अशी माहिती जितेंद्र आव्हाड यांनी दिली. राज्यभरातून महिला नोकरीसाठी, मुलाखतींसाठी मुंबईत येतात. त्यांना राहण्यासाठी हे हॉस्टेल बांधण्यात येणार आहे.