शिवसेने नेते संजय राऊत यांनी शिवसनेचे मुखपत्र असलेल्या सामना वृत्तपत्रात देशातील बड्या नेत्यांच्या सुरक्षेवरुन वक्तव्य करुन केंद्र सरकारवर टीका केली होती. संजय राऊत यांनी केलेल्या टीकेवर भाजपकडून प्रतिक्रिया देण्यात आली आहे. भाजप उप प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी संजय राऊत यांच्यावर निशाणा साधत राज्यातील समस्यांवर आपल्या दिव्य ज्ञानाचा प्रकाश टाकावा असा टोला लगावला आहे तर राष्ट्राची चिंता करण्यासाठी मोदी सक्षम असून राज्याची चिंता करा असं खोचक विधान चित्रा वाघ यांनी केलं आहे. तसेच राज्यातील मुख्यमंत्र्यांची सुरक्षा काढून आदर्श दाखवून द्या असे आवाहनच चित्रा वाघ यांनी केलं आहे.
भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी ट्विट करत शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. सर्वोच्च ज्ञानी आणि सोनिया सेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांनी आपल्या सवयीमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री आणि देशातील इतर नेत्यांना पुरवण्यात आलेली सुरक्षा अनाठी आहे असा जावाईशोध लावला आहे. अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय प्रश्नांवर पंतप्रधान मोदी परखड भूमिका घेत असतात अशावेळी त्यांची सुरक्षा ही राष्ट्रीय सुरक्षेचा विषय असतो. हे आपल्याला कितपत व कसे समजेल हे मला सांगता येणार नाही. कारण हा विषय खूप मोठा आहे. तरीही आपण जे म्हणत आहात की, नेत्यांच्या सुरक्षेवरती पैसे खर्च होत आहेत ते अनाठायी आहेत. तर याची सुरुवात आपल्या घरापासून केली तर काय हरकत आहे.
सर्वोच्च ज्ञानी व सोनिया सेनेचे प्रवक्ते
संजय जी राऊत ह्यांनी आपल्या प्रात:कालीन सवयीनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी जी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा जी आणि देशातील तमाम बड्या नेत्यांना देण्यात आलेली सुरक्षा अनाठायी आहे असा जावईशोध लावला आहे (१/२) @rautsanjay61 pic.twitter.com/tbGdDYfev6— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) July 18, 2021
दरम्यान चित्रा वाघ यांनी पुढे म्हटलं आहे की, आपल्या राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे फारसे कुठे जात नाहीत ते एकतर आपल्या मातोश्री निवासस्थानी असतात किंवा शासकीय वर्षा निवासस्थानी असतात त्यांच्या सुरक्षेचा फारसा प्रयत्न उद्भवत नाही त्यामुळे त्यांची सुरक्षा काढून आपण आपल्या घरातनं एक आदर्श करुन द्यायला काय हरकत आहे. यामुळे याच्यावरही आपण विचार करावा तसेच आपलं राष्ट्रीय पातळीवरील अस्तित्व हे बिहार निवडणूकीमध्ये दिसलं आहे. यामुळे देशाची आणि राष्ट्राची काळजी करायला पंतप्रधान मोदी सक्षम आहेत. राज्यातील समस्यांवर आपण प्रकाश टाकला पाहिजे मुंबईची तुंबई होतेय रेल्वे बंद आहेत अशा समस्यांवर आपण लक्ष दिलं पाहिजे असा टोला भाजप उप प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी लगावला आहे.