काल (ता. ०४ एप्रिल) मंगळवारी नागपूर येथे भाजप-शिवसेना आयोजित सावरकर गौरव यात्रेची सांगता करण्यात आली. यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी देखील उपस्थित होते. पण सुधांशू त्रिवेदी यांच्या उपस्थितीवरून काँग्रेसकडून भाजप आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधण्यात आला आहे. “‘फडतूस’ फडणवीसांनी छत्रपती शिवरायांचा पद्धतशीरपणे अपमान करायचं ठरवलंय!” अशा आशयाचे ट्वीट काँग्रेसच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून करण्यात आलेले आहे.
२०२२ मध्ये काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबाबत वादग्रस्त विधान केले होते. त्यावेळी सुधांशू त्रिवेदी यांनी सुद्धा छत्रपती शिवाजी महाराज यांनी सुद्धा औरंगजेबाची माफी मागण्यासाठी पाच पत्र लिहिले होते, असे वक्तव्य केले होते. त्यांच्या या वक्तव्यावर अनेकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत गरळ ओकणाऱ्या व्यक्तीला भाजपने राज्यात बोलावल्याने आणि व्यासपीठावर स्थान दिल्याने काँग्रेसकडून भाजपवर निशाणा साधण्यात आला.
“छत्रपती शिवाजी महाराजांनी मुघलांची ५ वेळा माफी मागितली म्हणणारा सुधांशू त्रिवेदी आणि “काकतालीय नितीप्रमाणे (कावळा बसायला आणि फांदी तुटायला) शिवाजी राजा झाला. नायतर त्याची योग्यता नव्हती” म्हणणारे सावरकर… ‘फडतूस’ फडणवीसांनी छत्रपती शिवरायांचा पद्धतशीरपणे अपमान करायचं ठरवलंय!” असे ट्वीट काँग्रेसकडून करण्यात आलेले आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांनी मुघलांची ५ वेळा माफी मागितली म्हणणारा सुधांशू त्रिवेदी
आणि
"काकतालीय नितीप्रमाणे (कावळा बसायला आणि फांदी तुटायला) शिवाजी राजा झाला. नायतर त्याची योग्यता नव्हती" म्हणणारे सावरकर
‘फडतूस’ फडणवीसांनी छत्रपती शिवरायांचा पद्धतशीरपणे अपमान करायचं ठरवलंय! pic.twitter.com/vwtBC4WcC1
— Maharashtra Congress (@INCMaharashtra) April 5, 2023
राज्याचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान करणारे सावरकर आम्हाला मान्य नाहीत, अशी भूमिका याआधीच काँग्रेसकडून स्पष्ट करण्यात आलेली आहे. त्यामुळे छत्रपती शिवरायांचा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान करणारे सावरकर तुम्हाला मान्य असतील, पण आम्हाला नाही, असे काँग्रेसकडून सांगण्यात आलेले आहे.
दरम्यान, नागपूर येथे झालेल्या सावरकर गौरव यात्रेत छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान करणाऱ्या सुधांशू त्रिवेदी यांना बोलावण्यात आल्याने काँग्रेसने भाजप आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. त्यामुळे छत्रपती शिवरायांचा अपमान करणारा व्यक्ती भाजपसाठी महत्त्वाचा आहे, पण त्यांच्यासाठी शिवराय महत्त्वाचे नाही का? असा प्रश्न आता उपस्थित होऊ लागला आहे.
हेही वाचा – अटकेनंतर डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, आरोप निराधार; पाहा नमके प्रकरण काय?