मुंबई : वाढती महागाई, बेरोजगारीच्या विरोधात केंद्र सरकारचा निषेध करण्यासाठी राजभवनाला घेराव घालण्याच्या तयारीत असलेल्या कॉंग्रेस नेत्यांना पोलिसांनी आंदोलनापासून रोखले. पोलिसांच्या या कारवाईविरोधात विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांनी तीव्र संताप व्यक्त केला. केंद्र सरकारने भाकरीवर, पिठावर, लहान मुलांच्या दुधावर जीएसटी लावला असताना आम्ही आंदोलन करायचे नाही का? असा सवाल थोरात यांनी केला.
कॉंग्रेसने आज देशभरात महागाईच्या विरोधात आंदोलन केले. प्रदेश कॉंग्रेसच्या नेत्यांनी शुक्रवारी राजभवनाला घेराव घालण्याची तयारी केली होती. त्यासाठी कॉंग्रेस नेत्यांची विधानभवनात बैठक सुरु होती. ही बैठक सुरू असताना पोलिसांनी विधानभवनाच्या बाहेर कॉंग्रेस नेत्यांना ताब्यात घेतले. यावेळी थोरात, अशोक चव्हाण आणि पोलीस अधिकाऱ्यांमध्ये शाब्दिक चकमक झाली.
राजभवनाच्या बाहेर आंदोलन करता येणार नाही, असे पोलीस अधिकाऱ्यांनी कॉंग्रेस नेत्यांना सांगितले. त्यावेळी कॉंग्रेस नेते संतापले. आंदोलन करण्याचा आमचा अधिकार आहे. स्वातंत्र्य चळवळीतसुद्धा आंदोलन होत होते. आता आंदोलन करायचे नाही असे कसे म्हणता. आमचे आंदोलन शांततेच्या मार्गाने आहे. आम्ही कायदा मोडायला निघालो नाही. ब्रिटिशांच्या काळात आंदोलन चालू होते. आता ईडी सरकारच्या काळात आंदोलन बंद केले काय? असा सवाल करताना योग्य कारणासाठी आंदोलन करण्याचा आम्हाला अधिकार आहे, असे थोरात यांनी पोलीस अधिकाऱ्यांना सुनावले.
दडपशाहीपुढे
झुकणार नाहीहुकूमशाहीपुढे
वाकणार नाहीहा संघर्ष आहे
हक्कासाठीचाकाँग्रेस
हार कधी मानणार नाही !#महंगाई_पर_हल्ला_बोल pic.twitter.com/kGCcHx3s9z— Balasaheb Thorat (@bb_thorat) August 5, 2022
जनतेच्या प्रश्नांवर संघर्ष करणार : नाना पाटोले
दरम्यान, देशातील जनता महागाईने त्रस्त असताना केंद्र सरकारने जीवनावश्यक वस्तुंवर जीएसटी लावून गोरगरिबांच्या तोंडातला घास हिरावून घेतला. देशात बेरोजगारी वाढली असून अग्निपथ योजना आणून तरुणांच्या जखमेवर मीठ चोळले आहे. जनतेच्या या प्रश्नांवर जाब विचारण्यासाठी राजभवनला घेराओ घालण्याचे काँग्रेसने घोषीत केले असता राज्यातील ईडी सरकारने रात्रीपासूनच काँग्रेस नेते आणि कार्यकर्त्यांची धरपकड केली. विधान भवनातून आंदोलनासाठी जात असतानाच काँग्रेस नेत्यांना पोलिसांनी अटक केली. ईडी सरकारने दंडेलशाहीच्या जोरावर आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न केला.पण अशा कारवायांना घाबरत नाही, असंही ते म्हणाले.
आम्ही जनतेच्या प्रश्नावर संघर्ष करतच राहू,अशा इशारा कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिला. लोकशाहीमध्ये जनतेचे प्रश्न मांडणे गुन्हा नाही.पण नरेंद्र मोदींचे सरकार लोकशाही मानत नसून विरोधकांचा आवाज बंद करण्याचा प्रयत्न करत आहे, असा आरोपही त्यांनी केला. दरम्यान, विधान भवनातून बैठक आटोपून राजभवनाला घेराव घालायला निघालेल्या नाना पटोले, बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, वर्षा गायकवाड, माजी मंत्री प्रदेश कार्याध्यक्ष चंद्रकांत हंडोरे, नसीम खान, आमदार अमर राजूरकर, वजाहत मिर्झा, अभिजीत वंजारी आदीना पोलिसांनी विधानभवन परिसरातून अटक केली.
हेही वाचाः मविआच्या स्थापनेनंतरही युतीची चर्चा सुरू होती, पण राणेंमुळे मोडता; केसरकरांचा गौप्यस्फोट