राज्यासह देशभरात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. फेब्रुवारी महिन्यांपासून राज्यातील ग्रामीण भागात कोरोनाची रुग्णसंख्या वाढत आहे. त्यामुळे काही जिल्ह्यांमध्ये कडक निर्बंध तर काही जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. औरंगाबादमध्ये कोरोनाचा कहर कायम आहे. त्यामुळे आता प्रशासनाने पुन्हा एकदा औरंगाबादमध्ये लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला आहे. ३० मार्च ते ८ एप्रिलपर्यंत औरंगाबादमध्ये लॉकडाऊन लागू करण्यात येणार आहे.
काही दिवसांपासून रोज औरंगाबादमध्ये रुग्णांची मोठी वाढ होत आहे. बाजारपेठ, इतर ठिकाणी लोकांची झुंबड उडत आहे. यामुळे कोरोनाच्या रुग्णसंख्येत जास्त भर पडत आहे. शुक्रवारी औरंगाबाद जिल्ह्यात दिवसभरात १ हजार ५०० पेक्षा जास्त रुग्णांची वाढ झाली होती. त्यामुळे अनेकांकडून परिस्थिती गंभीर होत आहे, अशी मत व्यक्त होत होती. त्यामुळे याच अनुषंगाने प्रशासनाने कडक पवित्रा धारण करत थेट पुन्हा एकदा औरंगाबाद जिल्ह्यात लॉकडाऊन जाहीर केला आहे. येत्या ३० मार्चपासून ते ८ एप्रिलपर्यंत लॉकडाऊन लागू असणार आहे. यादरम्यान नागरिकांना घराबाहेर पडण्यासाठी सक्त मनाई केली आहे.
यापूर्वी औरंगाबादमध्ये अंशतः लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. ११ मार्चपासून अंशतः लॉकडाऊन घोषित केला होता. पण तरीदेखील कोरोनाची रुग्णसंख्या कमी झाली नाही. त्यानंतर आता संपूर्णतः लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला आहे.
हेही वाचा – New Guidelines: राज्यात मिशन बिगिन अगेन; वाचा कोरोनाच्या नव्या गाईडलाईन्स